पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/८२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ७२ )
इचलकरंजी संस्थानचा इतिहास.


त्या दिवसपासून पेशवाई दरबारांत भाऊसाहेबांखेरीज पान हालेनासें झालें. या दोन भावांत पेशवाईबद्दलचा तंटा सुरू होता तर अर्थात् त्या द्वारानें सातारा व करवीर येथील छत्रपतींत मराठी साम्राज्याच्या मालकीबद्दल पुन्हां वाद माजून राहिला असता; पण नानासाहेबांच्या समयोचित वर्तनामुळें तो प्रसंग टळला !
 सन १७५३ त नानासाहेब पेशवे कर्नाटकच्या स्वारीस निघाले. तुंगभद्रेपलीकडल्या मुलखांत स्वारी करून तिकडच्या संस्थानांपासून खंडणी घ्यावी हा त्यांचा मुख्य उद्देश होताच. पण त्याशिवाय करवीरकर महाराज यांचेंही समाधान करून त्यांची मर्जी आपणावर सुप्रसन्न करून घ्यावी हा त्यांचा आणखी एक उद्देश होता. तो उद्देश साधण्याकरितां स्वारीस जातां जातां ते संभाजीमहाराजांची भेट घेण्यासाठी करवीरास गेले. राज्याच्या वडिलकीची सनद शाहूमहाराजांनी पेशव्यांस दिली होती ती मान्य न करणारीं माणसें राजकुलामध्ये पांच होतीं. त्यांपैकीं रामराजे यांस पेशव्यानीं सर्वथा वश करून घेतलें होतें. " अमुक सरंजाम मला द्या, तेवढा खाऊन तुम्ही जें जें कराल त्याला मी रुकार देत जाईन, राज्याचा कारभार तुम्ही वाटेल तसा करावा, " असा कागद रामराजे यांनीं पेशव्यांस लिहून दिला होता ! सकवारबाई सती गेल्यामुळें त्यांचा ग्रंथ आटोपलाच होता ! बाकीं जीं तीन माणसें राहिली तींही धनीच असल्यामुळें त्यांवर सक्ती व जुलूम करून त्यांस वठणीस आणण्याचा उपाय पेशव्यांस करितां येणें अशक्य होतें. तीं तिघें मात्र त्यांस चिरडण्याकरितां वाटेल तसले घाव बेलाशक घालीत होतीं !गेल्या वर्षी मोंगलानीं नानासाहेबांची पेशवाई बुडविण्यासाठी लढाई सुरू केली त्या वेळीं मोंगलांचे दिवाण रामदासपंत यांचे ताराबाईशीं जसें आंतून सूत्र होतें तसेच संभाजी महाराजांशींही होतेंच. कसेंही करून या पेशव्यास