पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करण्याचा बोजा नव्हता. हिंदुस्थानात सर्व संस्थान इनाम असल्याचें हे एकच उदाहरण माझा पहाण्यांत आहे. एका खेड्यापासून तो मोठ्या प्रांतापर्यंत पटवर्धनांच्या जहागिरी त्या कुलांतील पुरुषांनी केवळ तरवारीच्या जोरावर मिळविल्या आहेत व राखिल्या आहेत. इचलकरंजी संस्थानाचा प्रारंभ त्याच कारणाने झालेला असला तरी त्याचा विस्तार व रक्षण होण्याच्या कामी एका बुद्धिमान् बाईची ४० वर्षांची करामत खर्ची पडलेली आहे ! पटवर्धनांचा वतनदारीशी कांहीं सबंध नाही, पण इचलकरंजी संस्थानावरची बहुतेक संकटे वतनदारीमुळे प्राप्त झालेली आहेत ! हिंदुस्थानांतील लोकांची वतनावर अत्यंत आसक्ति असते असे परक्या लोकांनी आम्हांविषयीं वर्णन केलेले आहे. इचलकरंजीचा इतिहास वाचला म्हणजे त्या वर्णनाचा खरेपणा मनास चांगला पटतो ! करवीर राज्यांतलें सालिना चार हजार रुपयांचे भिकार देशमुखीचे वतन तें काय, आणि तें राखण्यासाठी इचलकरंजी संस्थानाने करवीरकरांशी तीन वर्षे लढाई करावी आणि पांच लक्ष रुपये खर्च करावे ! केवढा अल्प लाभ आणि केवढी मोठी हानि ! या लढाईला अन्य कारणेही आहेत, पण मुख्य कारण वतनदारी !

 पटवर्धनी जहागिरी व इचलकरंजी संस्थान यांत वर लिहिलेल्या प्रकारची विसदृशता असल्यामुळे इचलकरंजी संस्थानाचा इतिहास ऐ. ले. संग्रहांत न आणितां त्याचा स्वतंत्रच ग्रंथ लिहावा असें मनांत आलें व त्याप्रमाणे शेवटच्या तीन प्रकरणांखेरीज बाकीचा सर्व इतिहास तयार करून पुष्कळ दिवस झाले. यंदां हा इतिहास छापण्याचा योग यदृच्छेनें आल्यामुळे सर्व ग्रंथ समाप्त करून वाचकांस सादर करीत आहे.
 सातारचे महाराज, पेशवे व करवीरकरमहाराज यांच्या दौलतींच्या इतिहासांत इचलकरंजी संस्थानाचा उद्भव, विस्तार व त्यावर आलेली नानाविध संकटांची परंपरा यांची गुंतागुंत झालेली असल्यामुळें