पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/५७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ४७ )
व्यंकटराव नारायण.

ड्यांचे नांव कशाला पाहिजे ? तुमच्याच नांवें सनद करून देतों पण ती गोष्ट व्यंकटरावांस पसंत पडली नाहीं. त्यांनीं महाराजांस अर्ज केला कीं, सनद पूर्वीप्रमाणे राणोजी घोरपडे यांसच द्यावी. ते देतील तर तीच सनद त्यांजपासून आम्ही मागून घेऊं व तेवढी आम्हास पुरे ! मग शाहूमहाराजांनी स. १७३४ सालीं राणोजीच्याच नांवें सनद तयार केली. तें वर्तमान राणोजी घोरपडे यांस कळतांच व्यंकटरावांच्या कृतज्ञतेचें हें उदाहरण पाहून त्यांस हर्ष झाला व त्यांनी तीच देशमुखीची सनद त्यांस बक्षीस दिली एवढेंच नव्हे, तर पुढच्या वर्षी म्हणजे सन १७३५ साली मौजे रांगोळी हा आपला इनाम गांव त्यांस इनाम करून दिला.

 सन १७३९ त व्यंकटरावांनीं इचलकरंजीचें ठाणे बांधण्याची सुरुवात केली. गांवकुसवापैकीं अमुक उंचीचा व रुंदीचा भाग रयतेपैकीं प्रत्येक कुळानें बांधून द्यावा, याप्रमाणें ठराव करून त्यांनीं गांवकरांकडून सक्तीनें गांवकुसूं घालविलें.

 सन १७३७ त मराठे व पोर्च्युगीज यांमध्यें युद्ध सुरू झालें व तें सुमारें चार वर्षे चालू होतें. पहिल्या वर्षी मराठ्यांनीं साष्टी घेतली व पुढच्या वर्षी उत्तर कोंकणापैकीं आणखी कांहीं भाग काबीज केला. तिकडच्या पोर्च्युगीज लोकांस गोंव्याहून कुमक न जावी म्हणून खुद्द गोंव्यावरच स्वारी करण्याची मसलत सातारच्या दरबारीं घाटूं लागली. व्यंकटरावांजवळ गोविंदराम ठाकूर म्हणून एक सरदार होता तो त्या प्रांताचा माहितगार होता. त्यानें गोंव्यावर स्वारी करण्याचे काम पतकरण्याविषयीं व्यंकटरावांस उत्तेजन दिले. त्या वरून त्यांनीं शाहूमहाराजांस विनंति केली कीं, आपणास आज्ञा