पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/४१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३१ )
व्यंकटराव नारायण.

पुत्राप्रमाणें मानून त्यांचें कल्याण केलें; तें स्मरून नारोपंतांनीं आमचे वडील वारले तेव्हां आम्ही नेणतीं मुलें होतों तरी आमच्या दौलतीसाठीं बहुत खस्त खाल्ली व आम्हांस जतन करून वाढवून शहाणे करून आमची दौलत आमचे हवालीं केली. त्यांनीं भाऊपणाचें उत्तम सार्थक केलें. त्यांचे तुम्हीं पुत्र आहां ते आमचेच आहां. तुमच्या निर्वाहाची सोय आम्हांस करून देणें प्राप्त आहे. आमचें देशमुखी सरदेशमुखीचे वतन मिरजप्रांत आहे तें आमचे वडिलानीं व आम्हीं नारोपंतांकडे वहिवाटीस दिलें होतें. तेंच वतन आम्ही तुम्हाकडे चालू ठेवितों. वतनाचे उत्पन्न खाऊन तुम्ही खुशाल निर्वाह करावा." याप्रमाणें सांत्वन करून सेनापति कापशीस गेले. या वेळीं व्यंकटरावांचे वय सुमारे १७|१८ वर्षाचें होतें. ते अल्पवयी होते म्हणून त्यांच्या घरचा कारभार कांही वर्षे त्यांचे उपाध्ये हरिभटबावा व त्यांचे पुत्र कृष्णंभट व त्र्यंबकपंत आपा हेच पहात असत.
 वर सांगितलेल्या देशमुखी सरदेशमुखीच्या वतनाची सनद कापशीकरांस राजाराममहाराज यानीं दिलेली होती. त्यांचे पुत्र शिवाजीमहाराज यानीं आपल्या कारकीर्दीत नवीन सनद देऊन तेंच वतन त्यांजकडे कायम केलें. आतां शाहूमहाराज यांची नवीन कारकीर्द सुरू झाली तेव्हां पूवींच्या क्रमाप्रमाणें त्यांचीही सनद मिळणें जरूर होतें. वतनाच्या मालकीस नांव मात्र कापशीकरांचे व भोगवटा व्यंकटरावांचा असल्यामुळें व सासुरवाडीकडून म्हणजे पेशव्यांकडून शाहूमहाराजांच्या दरबारात व्यंकटरावांचा वशिला उत्तम रीतीचा असल्यामुळें त्या महाराजांकडून पिराजी घोरपडे कापशीकर यांच्या नांवें ही वतनाची सनद मिळण्यास अडचण पडली नाहीं. शाहूमहाराजानीं सन १७२१ या वर्षी प्रांत मिरज येथील देशमुखी सरदेशमुखीची सनद पिराजीराव यांचे नांवें करून दिली.