पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/३१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(२१)
नारो महादेव.

कुळकर्ण नारोपंतानीं सन १६९७ चे सुमारास शंभर होन देऊन खरेदी घेतलें. त्यांचा बाप तें कुळकर्ण गुमास्ता या नात्यानें चालवीत होता तें आतां त्यांचें वतनी झालें. या कुळकर्णाच्या खरेदीचा पट्टा "शके १६१९ ईश्वर नाम संवत्सरे आषाढ शुद्ध तृतीयेस ग्राम पुरुषाचे अनुमतें १ देव ठाकूर मतकरी २ विठ ठाकूर गांवकर ३ काळ ठाकूर गांवकर." यांणीं लिहून दिला होता. "तो भूमीमधें धामधूम करितां आच्छादून ठेविला होता यास्तव जीर्ण होऊन अक्षरें थोडीं थोडीं गेली याकरितां तो पट्टा आणून दाखविला त्यावरून "ग्रामाधिकारी यानीं नवीन पट्टा शके १६३६ जय नाम संवत्सरे श्रावण शुद्ध सप्तमी भृगुवासरे या दिवशी करून दिला. वाडीकर सावंतांकडून तो म्हापण गांव नारोपंतास इनाम मिळाला याची सनद सन १७१४ त दिलेली आहे तींत सुद्धां पूर्वीची सनद हरवल्याचा उल्लेख आहे. त्यावरून या सालापूर्वीच तो गांव त्यांस इनाम मिळाला होता असे स्पष्ट होते. हा म्हापण गांव नारोपंतांस सावंतानी इनाम दिल्याविषयींची एक दंतकथा अशी आहे की, रामचंद्रपंत अमात्य यानीं एकदां सावंतवाडी संस्थानावर स्वारी करून खुद्द सावंतवाडीस वेढा घातला. तेव्हां त्या फौजेंत मुख्य सरदार नारोपंत होते, त्यांनी सावंतांस तह घडवून आणण्याच्या कामीं मदत करून वाडी संस्थानाचा बचाव केला म्हणून सावंतानीं कृतज्ञ होऊन नारोपंतांस तो गांव इनाम दिला.
 सन १७०७ मधें औरंगजेब मरण पावला. त्याच्या लष्करांत शाहूमहाराज कैदेंत होते त्यांस बादशहाच्या मुलानें हिंदुस्थानांत बरोबर नेलें होतें तेथून सोडून दिलें. त्यानंतर शाहूमहाराज आपलें राज्य घेण्यासाठी दक्षिण प्रांती येऊं लागले. परंतु ताराबाईंच्या मनांत राज्य द्यावयाचें नव्हतें. अर्थातच राज्यांतच दुफळी झाली. राज्याकरितां पुढे होणाऱ्या झटापटींत आपणास यश यावें म्हणून ताराबाई