पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/२४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १४ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

पत्रें लिहिलेली आमच्या पहाण्यांत नाहींत. वर लिहिलेल्या मायन्याचीं पत्रें परस्पर लिहिण्याचा प्रघात दुसरे संताजीराव यांच्या वेळेपासून पडलेला आहे असें दिसतें.
 संताजीरावांस दोन बायका होत्या व प्रत्येकीस एकेक पुत्र झाला होता. थोरल्या मुलाचें नांव राणोजी व धाकट्याचें पिराजी. शिवाय संताजीरावांचा मानलेला मुलगा नारोपंत हा तिसरा पुत्र होय.
 धनाजी जाधवराव व संताजी घोरपडे यांमध्यें अलीकडे बरेच दिवस वांकडें आलें होतें. सन १६९७ त राजाराममहाराज जिंजीहून स्वदेशी परत आले. त्यानीं या उभय सरदारांचा समेट करून द्यावा तें न करितां जाधवरावांचा पक्ष धारिला, त्यामुळें संताजीरावांचें बळ अर्थातच कमी पडलें. त्या दोघां सरदारांच्या फौजांचा विजापुरानजीक तळ पडला असतां जाधवरावानीं घोरपडयांच्या बहुतेक फौजेंत फितूर केला व त्या फौजेच्या मदतीनें संताजीरावांस धरण्याचा बेत केला. ती बातमी संताजीरावांस कळतांच त्यानीं नारो महादेव वगैरे आपले विश्वासू सेवक व मुलेंमाणसें व जीवास जीव देणारी थोडीशी फौज होती ती घेऊन तेथून पळ काढिला. त्यानंतर कांही दिवस ते जाधवरावाचा शह चुकवीत मुलूखांतून हिंडत होते. एके प्रसंगीं त्यांचा मुक्काम म्हसवडास पडला. तेथील देशमुख माने यांचें पारिपत्य चंदीच्या स्वारींत त्यानीं केलें होतें हें मागें सांगितलेंच आहे. तो दंश मनांत धरून माने याची स्त्री राधाबाई म्हणून होती तिनें त्यांस मेजवानीच्या मिषानें राहवून घेतलें. दुर्दैववशात् तें कपट यांच्या लक्षांत आलें नाहीं ! त्यांनी नारोपंताबरोबर फौज व बुनगें व कुटुंबाचीं माणसे पुढच्या मुक्कामास पाठवून दिली व आपण सडे पांच पंचवीस जुजबी मंडळीसह तेथें राहिले. नंतर दुसरे दिवशीं तेथून निघाले तों एका अडचणीच्या