पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/२०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १० )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

यांच्या घराण्याकडे " हिंदुराव ", व मालोजीराव यांच्या घराण्याकडे " अमीर उल् उमराव " असे अद्यापि चालत आहेत. असो.
 सन १६९१ च्या प्रारंभीं संताजीराव व धनाजी जाधवराव परत महाराष्ट्राकडे येऊन रामचंद्रपंत " हुकमतपन्हा " यांस मिळाले. राजाराममहाराजानीं स्वदेशीं रामचंद्रपंतांस ठेविलें होतें व इकडील किल्ले व मुलूख संभाळण्याचें काम त्यांवरच सोपविलें होतें. त्यांच्या मदतीस संताजीरावानीं कर्नाटकांत जातांना कांही फौजेसह नारोपंतांस ठेविलें होतें. नारोपंत व रामचंद्रपंत यांच्या ऋणानुबंधास येथून सुरुवात झाली व त्याचा नारोपंतानी पुढें पुष्कळ उपयोग करून घेतला. संताजीराव चंदीहून परत आल्यावर मोंगलांवर स्वाऱ्या करण्याकरितां फौजेची नवीन जमवाजमव त्यानीं व रामचंद्रपंतांनीं झपाट्याने सुरू केली. संताजीराव व बहिरजी हिंदुराव व विठोजी चव्हाण हिंमतबहाद्दर यानीं खुद्द औरंगजेब बादशहाच्या फौजेवर छापा घालून त्याच्या डेऱ्याच्या तणावा तोडून सोन्याचे कळस काढून आणिले असें बखरीतून लिहिलेले आहे ती गोष्ट बहुधा याच साली घडली असावी.
 सन १६९२ त संताजीरावानीं वांईच्या फौजदारावर छापा घालून त्यास त्याच्या सैन्यासह कैद केलें. नंतर लवकरच मिरजेच्या फौजदाराचीही हीच दुर्दशा केली. त्या वेळीं महाराजांच्या आज्ञेवरून रामचंद्रपंतांनीं संताजीरावांस मिरज प्रांताची देशमुखी व सरदेशमुखी इनाम दिली. स. १६९३ त संताजीराव व धनाजी जाधवराव यांनीं गंगथडीवर स्वारी केली व तीन वर्षे तिकडे राहून तों मुलूख लुटून जाळून बेचिराख करून टाकिला, आणि बादशहाच्या लष्करास पुरवठा करण्याकरितां हिंदुस्थानांतून कारवाने व खजिना त्या मार्गानें येत असे तो कित्येक वेळां लुटून घेतला. यांच्या पारिपत्याकरितां बादशहाकडून आलेल्या एकामागून