पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१९६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १८६ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

या सर्व वर्णनावरून बाबासाहेबांचीं कारकीर्द किती प्रगमनशील आहे हें दिसून येईल.
 बाबासाहेबांस सार्वजनिक कामाची हौस मोठी आहे. मुंबई व पुणे येथें भरलेल्या अनेक सभांतून अध्यक्ष या नात्यानें त्यानीं भाषणें केलेलीं आहेत त्यावरून त्यांचें वक्तृत्व बऱ्यापैकीं आहे हें लोकांस दिसून आलेंच असेल. सार्वजनिक उपयोगाची कोणतीही चळवळ निघो, तीस उत्तेजन देण्याच्या कामीं ते तत्पर असतात. त्यांच्या मदतीचा उपयोग करून घेणाऱ्या असल्या अनेक संस्था महाराष्ट्रांत हल्लीं विद्यमान आहेत.सन १८९७ पासून दक्षिणेंतील इनामदार व सरदार यांच्या तर्फेनें त्यांनीं कायदे कौन्सिलच्या मेंबरचें काम १४/१५ वर्षे चांगल्या प्रकारें बजाविलें आहे.
 बाबासाहेबांस पूर्ववयांत शिकारीचा नाद बराच होता.सन १८९४ सालीं एकदां आंबेघाटाच्या जंगलांत ते शिकारीस गेले असतां बरोबर शिपाई होते त्यांतल्या एकाची बंदूक चुकून उडून बाबासाहेबांच्या अंगांत छरे घुसले. या दुखण्यांतून ते मोठ्या शर्थीनें बचावले.अजूनसुद्धां डोंगरांतून व जंगलांतून हिंडत हिंडत सृष्टिसौंदर्य-निरीक्षण करण्याचा त्यांस नाद आहे. त्यांस प्रवासाचा हव्यास आहे. या देशाच्या सर्व भागांतून ते अनेक वेळां हिंडून आले आहेत.गेल्या वर्षी ते सिलोन, पिनांग,जावा हे देश पाहून आले.त्यांस वाचनाची हौस मोठी आहे व त्यांतले त्यांत इतिहास व तत्वज्ञान या विषयांकडे कल विशेष आहे. त्यानी ग्रंथसंग्रह चांगला केला आहे.नाटयगायनादि ललितकलांचे ते मार्मिक भोक्ते आहेत. ते स्वभावानें विचारी, करारी व उत्साही आहेत. त्यांची बुद्धि व्यापक असल्यामुळें नवीन कल्पनांचा सारासारविचारपूर्वक स्वीकार करण्यास समर्थ आहे. त्यांच्या वागणुकींत साधेपणा व व्यवहारज्ञता स्पष्ट दिसून येतात.