पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१९४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १८४ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

अभ्यास केला. त्यांच्या उच्च पदास शोभेल व उपयोगीं पडेल अशी सर्व विद्या झाल्यावर त्यांस ता. १८ जून सन १८९२ रोजी संस्थानची मुखत्यारी सरकारांतून देण्यांत आली.
 अहमदनगरचे वकील मोहनीराज मोरेश्वर परांजपे यांची कन्या दुर्गाबाई हिजशीं बाबासाहेबांचा विवाह फाल्गुन वद्य ८ शके १८०७ ता. २८ मार्च सन १८८६ या दिवशीं झाला. त्या बाईंचें सासरचें नांव गंगाबाई असें ठेवलेलें आहे, तथापि लोकांत त्यांचें नांव माईसाहेब हेंच प्रसिद्ध आहे. त्या सुशिक्षित व सुस्वभावी आहेत. इचलकरंजी संस्थानांत अलीकडे स्त्रीशिक्षणाचा जो काय प्रसार झाला आहे तो बहुतांशीं माईसाहेब यांच्याच प्रेरणेवरून झालेला आहे. माईसाहेब यांस सन १८९२ च्या डिसेंबरांत एक पुत्र झाला होता तो लागलाच वारला. त्यानंतर त्यांस अपत्य झालें नाहीं. बाबासाहेबांच्या गृहसुखांतली ही उणीव इचलकरंजीच्या प्रजेस फारच उद्वेगजनक वाटतें.
 विद्या हें मनुष्यमात्रास मोठें भूषण आहेच. त्यांत संस्थानिकाचें मन विद्येनें सुसंस्कृत झाले असतां ती गोष्ट त्यास भूषणीभूत होऊन शिवाय रयतेस केवढा मोठा फायदा होतो हें बाबासाहेबांस मुखत्यारी मिळाली त्या दिवसापासूनच्या त्यांच्या कारकीर्दीवरून स्पष्ट होत आहे.आपल्या रयतेमध्यें विदयेचा प्रसार करणे हें आपलें आद्य कर्तव्य आहे असें ते समजतात,व त्यास अनुसरून त्यांचे नानाविध दिशांनीं यत्न हळू हळू सुरू आहेत; व त्यांत त्यांस यशही बरेंच मिळालें आहे.त्यांच्या कारकीर्दीच्या प्रारंभी संस्थानच्या खर्चानें चालणाऱ्या १७ शाळा होत्या त्या आतां ४७ आहेत. संस्थानाचें अंशतः साह्य घेणारी शाळा १ होती त्या ठिकाणी आतां २१ आहेत. मुलींच्या ५ शाळा व अंत्यजांकरितां ४ शाळा संस्थानच्या खर्चानें चालू आहेत त्या