पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१९१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १८१ )
गोविंदराव केशव.

ईस्टइंडिया कंपनी साऱ्या भरतखंडाची मालकीण झाली तरी तिचा व्यापारी स्वभाव जातां जाईना ! आयव्ययविचार प्रथम आणि बाकीच्या गोष्टी मागून, ही कंपनीच्या कारभाराची तऱ्हा होती.स० १८५७ सालीं बंडाची भयंकर वावटळ उठून इंग्रजी राज्यास धोका उत्पन्न झाला तेव्हां एतद्देशीय संस्थानानीं सरकारास उत्तम प्रकारची मदत करून त्याची बाजू संभाळून धरिली. त्यामुळें विलयतेंतल्या प्रमुख मुत्सद्यांची खात्री झाली कीं, एतद्देशीय संस्थाने राहूं दिल्यापासून सरकारची हानि नसून उलट सरकारच्या राज्यास मोठी बळकटी आहे. बंडाचा बीमोड झाल्यावर कंपनीचें राज्य मोडून या देशाचा कारभार राजराजेश्वरी व्हिक्टोरिया महाराणींनी हाती घेतला. या दिवसापासून उदारपणानें एतद्देशीय संस्थानांची जोपासना करण्याकडेच सरकारची प्रवृत्ति आहे. या प्रवृत्तीस अनुसरून इचलकरंजी संस्थानासंबंधें विलायतेहून मुंबईसरकारास हुकूम आला कीं, सदरहू संस्थान सर्व इनाम असल्यामुळें सरकारास खालसा करितां येत नाही. त्यावर वारसा बायांचा पोंचत असल्यामुळें तें त्यांच्या हवालीं करावें व त्यांस दत्तक घेण्याची परवानगी द्यावी.
 याप्रमाणें इचलकरंजी संस्थान एकदां खालसा झालें असतांही त्याचा पुनर्जन्म झाला ! नंतर यशोदाबाईंनीं विश्वनाथराव हुपरीकर (तासगांवकर) यांचा मुलगा दत्तक घेण्याचा निश्चय केला.दुसरे नारायणराव व्यंकटेश यांचे जामात लक्ष्मणराव अण्णासाहेब पटवर्धन मळेकर यांनीं आपली कन्या जिजीबाई या भावि संस्थानिकांस देण्याचें ठरविले होते. दत्तविधान झाल्यावर निकट संबंधामुळे विवाह करितां येणार नाहीं, याकरितां दत्तविधान होण्यापूर्वी हा विवाहसमारंभ उरकून घेण्यांत आला. वधूचें सासरचें नांव पद्मावतीबाई असें ठेविलें. विवाह झाल्यावर या मुलास यशोदाबाईंनीं ता० १९