पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१८८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १७८ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

हुपरीकर ( मुद्देबिहाळकर ) यांचा धाकटा मुलगा पसंत ठरून स.१७५३ च्या अवलीस त्यास यशोदाबाईंनीं दत्तक घेऊन त्याचें नांव व्यंकटराव ठेविलें. तेथपर्यंत तीन महिने यशोदाबाई व गंगाबाई यांच्याच नांवें दौलतीचा कारभार चालला होता. बायानीं दत्तकाच्या मंजूरीबद्दल साठ हजार रुपये करवीरसरकारास नजराणा दिला.व्यंकटराव मोठे होतपर्यंत त्यांच्या दौलतीचा कारभार आपल्या देखरेखीखालीं रहावा म्हणून इंग्रज सरकारांतून कारभारी नेमण्यांत आला.व्यंकटरावांची मुंज दत्तक होण्यापूर्वीच झाली होती. दत्तक झाल्यावर एक वर्षांनी त्यांचे लग्न करण्याचा बेत ठरला.वामनराव गोविंद पटवर्धन सोनीकर यांची कन्या उपवर होती ती गंगाबाई व यशोदाबाई यानीं वधू निश्चित केली व त्याप्रमाणे त्या मुलीचें व्यंकटरावांशीं फाल्गुन शु० १५ शके १७७५ या दिवशी लग्न होऊन वधूचे नांव अनूबाई ठेवण्यांत आले. दुर्दैवी अनूबाई ! विवाहसमारंभाच्या मंगलवाद्यांचा ध्वनि कर्णपथातीत झाला न झाला, विवाहकंकणाचा मनगटास पडलेला करकोंचा अद्यापि मावळला न मावळला, तोंच अनूबाईच्या मस्तकावर वैधव्य वज्राचा प्रहार आदळला ! लग्न झाल्यापासून बरोबर चोविसावे दिवशीं चैत्र शु० ९ श७ १७७६ ता.८ एप्रिल स० १८५४ रोजी व्यंकटराव एकाएकच वारले ! त्यांच्या अकालिक मृत्यूमुळें इचलकरंजींत हाहाकार झाला तो काय वर्णावा !
 गंगाबाई व यशोदाबाई व त्यांचे कारभारी यांस तर आपण केलें काय, आणि झालें काय, असें होऊन ही मंडळी दुःखानें गांगरून गेली ! आतां पुनः दत्तक घेण्याची परवानगी मिळावी म्हणून उभयतां बायानीं मुंबईसरकारास थैली लिहिली. या थैलीचें उत्तर सरकारांतून आलें कीं, आतां दत्तक घेण्याची मंजुरी मिळणार नाही व