पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१५९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १४९ )
दुसरे नारायणराव व्यंकटेश.

दरबारानें पुढें इलाखाप्रकरणाचा जो एवढा फैलाव केला त्याचें बीज या कलमांत मोघम शब्दांनीं हळूच पेरून ठेविलें आहे ! अठराव्या व एकोणिसाव्या शतकांतला करवीरराज्याचा इतिहास ‘फूट' व 'जोड' या दोन शब्दांत समाविष्ट होतो ! अठराव्या शतकांत साताऱ्याच्या व पुण्याच्या जोरावर करवीरचे घाटगे व सेनापति वगैरे सरदार तेथील महाराजांशी फटकून वागत असत. एकोणिसाव्यांत तो जोर कमी पडतांच करवीर दरबार पुनः आपले सरदार कह्यांत आणण्याच्या उद्योगास लागलें व वेळ साधेल त्याप्रमाणे एकसारखा शंभर वर्षे उद्योग करून या दरबारानें अापला हेतु सिद्धीस नेला आहे.या देशांत इंग्रज सरकारची कारकीर्द सुरू झाली नसती तर करवीर दरबाराच्या प्रयत्नांस यश आलें नसतें हें उघडच आहे.
 शिंदे व होळकर यांमध्यें चुरस वाढून होळकर पुण्यावर चालून आले आणि शिंद्यांची फौज पुण्याजवळ राहिली होती तिचा त्यांनी पूर्ण पराजय केला. त्यामुळें पेशव्यांच्या मनात होळकरांविषयीं भय उत्पन्न होऊन ते कोंकणांत पळून गेले.होळकरांनी पुणें लुटले व अमृतराव यांचे पुत्र विनायकराव यांस पेशवाईच्या गादीवर बसविलें. नंतर पेशवे इंग्रजांस शरण गेले, व वसईच्या तहानें आपले स्वातंत्र्य गमावून परतंत्रपणानेंच कां होईना,पण सुरक्षितपणे व स्वस्थपणें राज्य करण्याच्या आशेवर संतुष्ट झाले ! मग त्यांस गादीवर बसविण्याकरितां इंग्रजांची फौज कांहीं मुंबईहून व कांहीं म्हैसुराहून पुण्यास आली. म्हैसुराकडून येणाऱ्या फौजेवर जनरल वेलस्लीसाहेब मुख्य सरदार होते. ते पुण्याकडे जात असतां इचलकरंजीपासून चार कोसांवर नांदणी येथें त्यांचा मुक्काम पडला.दक्षिण महाराष्ट्रांतील सर्व सरदार व संस्थानिक त्यांच्या भेटीस तेथें गेले होते. त्यांत बाबासाहेबही होते व करवीराहून रत्नाकरपंत