पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१५८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १४८ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास

सुद्धां त्यानीं दाद घेतली नाहीं ! सामोपचाराचे सर्व उपाय व्यर्थ झालेसें पाहून बाबासाहेब नवी फौज चाकरीस ठेवून संधि साधेल त्याप्रमाणें आपले गांव सोडवूं लागले, व महाराजांच्या मुलुखांतून जबरदस्तीनें देशमुखीचा वसूल घेऊं लागले.
 बाजीरावाच्या नादानपणामुळें व जुने अनुभवी मुत्सद्दी व सरदार मरून गेल्यामुळें पुणें दरबारांत आतां कांहीं राम राहिला नाहीं,फौजेच्या जबरदस्तीवर आज काल दौलतराव शिंदे प्रतिपेशवे होऊन बसले आहेत त्यांचे तेवढें सूत्र सांभाळिलें म्हणजे झालें, असें मनांत आणून करवीरकरांनीं सर्जेराव घाटग्यांच्या द्वारें शिंद्यांस अनुकूल करून घेतलें; व करवीरचा वेढा उठविण्याचे काम त्यांस सर्जेरावांचा मोठा उपयोग झाला, हें मागें सांगितलेंच आहे. करवीरकरांच्या मुठींत घाटगे, घाटग्यांच्या मुठींत शिंदे, आणि शिंद्यांच्या मुठींत बाजीराव,याप्रमाणे स्थिति असल्यामुळें करवीरकरांस पाहिजे ती गोष्ट मिळण्याचे ते दिवस होते ! करवीरकरांच्या सांगण्यावरून सन १८०१ सालीं घाटग्यांनी दौलतरावांपासून दोन यादींवर मखलाशीं करून घेऊन त्या यादी करवीरकरांस आणून दिल्या. त्या यादींपैकी एका यादींत कलम घातलेलें आहे तें असें-
 "(करवीर) राज्यातील इनामदार व जहागीरदार व देशमुख व जमेदार य सरंजामी श्रीमंतांकडील सक्तीचा उपर दाखवून ( वतनें, सरंजाम वगैरे) (पेशवे) सरकार(च्या) हुकुमाप्रमाणे अनुभवीत होते. ते हल्लीं एकंदर त्यांची तगिरी बहाली (महाराजांच्या )हुजुरास व्हावी. येविषयीं तुम्हांकडे आल्यास 'फिर्याद मनास आणूं नये,"
 हें करवीरकरांचें म्हणणें सर्जेरावानीं शिंद्यांपुढे मांडिलें, आणि शिंद्यानीं त्यावर 'सदरहूप्रमाणें करार' म्हणून लिहून दिलें ! करवीर