पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१५४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१४४)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास

आर्जवें करावीं,याप्रमाणें त्यानें खटपट पुष्कळ केली. परंतु त्याच्या खटपटीपासून दरबारच्या बडे लोकांस दामाजीपंतांचे दर्शन होत नसल्यामुळें त्याच्या खटपटीस यश आलें नाहीं ! लांच देण्यास जवळ पैका नसल्यामुळें जैन व ब्राह्मण यांसही देशमुखीचें वतन मिळाले नाहीं. ते वतन पेशवाई अखेरपर्यंत सरकारी जप्तींतच राहिलें. पुढें इंग्रज सरकारचे राज्य झाल्यावर या सरकारानें तें माधवराव गंगाधर पटवर्धन यांस बक्षीस दिलें. ते अद्यापि मिरजमळा संस्थानाकडे चालत आहे. काशींतल्या अन्नसत्राचा पैका वेळेवर पोंचत नाहीं अशी सबब लावून या सुमारास पूर्वीच्या यादींत ठरल्याप्रमाणें पेशव्यांनीं बेडग,कडलास,पापरी, वडगांव वगैरे १५००० हजार रुपयांचे गांव जप्त केले. याच जप्तींत पर्वती व हडपसर येथील बागा व पुण्यांतील वाडाही जप्त झाला होता. पण पुढें बागा व वाडा यांवरची जप्ती उठली.
 करवीरकरांचा उपद्रव पटवर्धन व इचलकरंजीकर यांच्या मुलखास प्रथम होऊ लागला व वाढतां वाढतां शेवटी त्याचें पर्यवसान असें झालें कीं,त्यांनी पेशव्यांच्या राज्यांत दक्षिण कृष्णा तीरीं चोहोकडे धुमाकूळ उडविला.त्यांनीं तिकडचा सर्व मुलूख लुटून फस्त केला,शैकडों ठाणीं काबीज केलीं,व पेशवेसरकारच्या लहानसहान फौजा गांठून लुटून धुळीस मिळविल्या.याच वेळीं सातारकर महाराजांचाही दंगा सुरू झाला. तेव्हां पेशवे भयभीत होऊन त्यांनी परशुरामभाऊंस कैदेंतून सोडिले व सातारकर महाराजांचा बंदोबस्त करण्याचें काम त्यांवर सोपविलें. परशुरामभाऊंनी फौज जमवून तें काम तत्काळ तडीस नेलें. त्यापूर्वी पेशव्यांनी नाना फडनविसांस शिंद्यांकडून कैद करविलें होते त्याचीही या सुमारास मुक्तता झाली व ते पुनः पेशवाईचा कारभार पाहूं लागले.मग भाऊ व नाना यांची पुन-