पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१५२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १४२ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

त्यांचा बेत होता,परंतु ती कुणकुण पागेच्या लोकांस कळतांच ते पळून इचलकरंजीस आले. त्यांचे मागोमाग कोल्हापूरकरांची फौज येऊन पुनः इचलकरंजीस शह देऊन बसली ! मग बाबासाहेबांनीं वारंवार आर्जवें केल्यावरून पुनः महाराजानीं ठराव केला कीं, १५००० हजार रुपये नजराणा दिल्यास आम्ही फौजेसह उठून जातों आणि घेतलेली ठाणीं व लूट परत देतो, व देशमुखी सरदेशमुखी सोडितो.त्याप्रमाणे बाबासाहेबांनी त्या रकमेची निशाचिठी दिली असतांही महाराजांनी परत जातां जातां टाकळी रामगया लुटली. तेथें ब्राह्मणांचीं घरें व सरकारी वाडा होता तो मोडून नेला, हुनशाळ लुटून फस्त केलें, शिरढोण जाळिलें, शिर्दवाड प्रांत मिरज या गांवापासून खंडणी घेतली आणि शिर्दवाड प्रांत कागल हें ठाणें ताब्यांत घेतले, हा जुलूम पडून बाबासाहेबांनी पुण्यास नाना फडनविसांस भीड घालून त्यांजकडून महाराजांस चार पत्रे लिहविली व रत्नाकरपंतआपासही पत्र लिहविलें,परंतु त्याचा कांहीं उपयोग झाला नाहीं. कोल्हापूरकरांकडून इचलकरंजीच्या गावखेड़यास उपद्रव व्हावयाचा तो जारीनें सुरू होताच.
 इचलकरंजीकरांस देशमुखी सरदेशमुखीचें वतन मिळाले होतें तें वतन थोरले संताजी घोरपडे यांस थोरले राजाराम महाराज यांनीं पूर्वी दिलें होते हें मागें लिहीलेंच आहे. हे वतन मूळचें जैनांचे असून ते परागंदा झालेले असल्यामुळे त्या वेळी राजाराम महाराजानीं ते संताजीरावांस दिले होते. परंतु पुढे शाहूमहाराजांच्या कारकीर्दीत ते जैन दरबारांत हजर होऊन वतनाबद्दल कापशीकर व इचलकरंजीकर घोरपडयांशी तंटा सांगूं लागले, यद्यपि पहिल्या बाजीरावांच्या कारकीर्दीपासून दर पेशव्यांच्या कारकीर्दीत जैन तंटा उपस्थित करीत असत.तथापि तंटयाचा निकाल इचलकरंजीकरांस अनुकूल असाच प्रत्येक वेळीं