पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१४९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १३९ )
दुसरे नारायणराव व्यंकटेश.

गांव ताब्यात घेऊन त्यांच्या उत्पन्नांतून हें अन्नसत्र चालवावयाचें, असेंही या वेळीं ठरलें होतें. इचलकरंजी संस्थानाची ही एक कायमचीच नुकसानी झाली.
 तारीख १६ व २४ ऑक्टोबर सन १७९५ रोजीं नजराणा वगैरे वर लिहिलेल्या कलमांची याद ठरली आणि तारीख २५ रोजीं सवाईमाधवराव पेशवे यांनीं शनिवारवाड्याच्या गच्चीवरून उडी टाकिली ! त्यानंतर दोन दिवसांनी त्या दुर्दैवी पेशव्यांचें देहावसान झाले. त्यानंतर वसईच्या तहानें राज्यांत इंग्रजांचा पाय मराठी राज्यात शिरकेपर्यंत म्हणजे ७ वर्षांच्या अवधींत पुण्यास ज्या धामधुमी व कारस्थाने घडून आली त्यांपैकी बहुतेकांचें संक्षेपाने येथे वर्णन करणे जरूर आहे. कारण कीं, इचलकरंजी संस्थानाच्या नुकसानीशीं त्या सर्व गोष्टींचा संबंध प्रत्यक्ष किंवा परंपरेनें पोंचत होता.
 सवाईमाधवराव मृत्यु पावल्यावर खरे म्हटलें तर पेशवाईची गादी बाजीरावसाहेबांस मिळावयाची, परंतु नाना फडनविसांनी बहुतेक सरदारांचें मत घेऊन असे ठरविलें कीं, मयत पेशव्यांची स्त्री यशोदाबाई हिच्या मांडीवर दत्तक देऊन त्याच्या नांवें गादी चालवावी. हा ठराव अमलांत येणार तों दौलतराव शिंद्यांचे कारभारी बाळोबा तात्या यांनीं बाजीरावांस गादीवर बसवावें म्हणून कारस्थान केलें. तें कानीं येतांच शिंद्यांच्या फौजेपुढें आपलें काहीं चालावयाचें नाहीं, असें समजून शिंद्यांचे कारभारी जें करणार तें आपण आगाऊ करुन टाकावें, असें योजून नानांनीं बाजीरावांस पुण्यास आणिलें. तें पहातांच बाळोबातात्यांस राग आला व ते नानाचें पारिपत्य करण्यासाठीं व बाजीरावांस गादीवर न बसूं देण्यासाठीं फौजेसह पुण्यास आले. तेव्हां नाना भिऊन साताऱ्यास पळून गेले. परशुरामभाऊंची व नानांची मैत्री बहुत दिवसांची असताही या वेळीं भाऊ नानांस