पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१४७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रकरण सहावें.
**********
दुसरे नारायणराव व्यंकटेश.
≈≈≈≈≈≈≈≈≈≈

 व्यंकटराव मरण पावल्यावर रमाबाईंनीं नारायणराव बाबासाहेब यांस दत्तक घेतलें खरें, पण पेशवेसरकारांत काय नजराणा द्यावयाचा त्याची रक्कम ठरून इचलकरंजी संस्थान अद्यापि जप्तींतून मोकळें होऊन त्यांच्या हातीं यावयाचे राहिलें होतें. ती सर्व व्यवस्था होईपर्यंत संस्थानचा कारभार महादजी विठ्ठल यांच्याच हातें पूर्वींप्रमाणे चालला होता.
 या सालीं खर्ड्याची स्वारी व्हावयाचें घाटूं लागलें त्या वेळीं सातारा राजमंडळाच्या सर्व सरदारांस आपापल्या फौजा घेऊन स्वारींत हजर होण्याविषयीं पेशव्यांची पत्रें आलीं. त्यावरून बाबासाहेब आपली फौज घेऊन स्वारीस गेले होते. खर्ड्याच्या लढाईंत परशुरामभाऊंस जखम लागून पटवर्धनांची फौज मागें हटली व निशाणही मागें सरलें; त्या वेळीं निशाणाजवळ राहून त्याचें रक्षण करण्याची कामगिरी बाबासाहेबांकडे परशुरामभाऊंनी सोंपविली होती. मोंगलाशीं तह होऊन सर्व लष्कर परत पुण्याकडे यावयास निघालें त्या वेळेस बाबासाहेब त्याबरोबर निघून पुण्यास आले. परंतु लष्कराबरोबर पेंढार होतें त्यास नर्मदापार घालविण्याकरितां सरकारांतून जी फौज नेमिली होती, तींत इचलकरंजीकरांची फौज असल्यामुळें ती मात्र तिकडे गेली.
 पुण्यास बाबासाहेब यांचे बरेच मुक्काम पडले. सरकारची जप्ती उठून संस्थान आपल्या हवालीं लौकर व्हावें, म्हणून त्यांची खटपट