पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१४३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १३३ )
दुसरे व्यंकटराव नारायण.

त्यांच्या दुर्व्यसनाचे सोबती असत त्यांबरोबर चैन करण्यांत त्यांचा सर्व काळ जाऊं लागला. त्यांस मोठें वेड शाक्तपंथाचें होतें व त्या पंथाच्या अनुष्ठानावर त्यांचा भरंवसा फार होता. सन १७८८ मध्यें त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई मृत्यु पावल्या त्यामुळें त्यांस अमुक करूं नका असें म्हणणारें कोणी राहिलें नाहीं ! त्यांचे कुटुंब रमाबाई यांशीं त्यांचें घटकाभरदेखील पटत नसे. लुच्चे लोक, कारकून, खिजमतगार व भटभिक्षुक त्यांस अधिकाधिक व्यसनासक्त होण्यास उत्तेजन देत ! अशी स्थिति झाल्यामुळें कर्ज महापुराप्रमाणे चढत चाललें व दौलतीत बेबंदी झाली. त्यानीं दारूचें व्यसन सोडावें, नाहीं तर सरकारानें त्यांस बहिष्कार घालून कैद करावें व त्यांचें संस्थान जप्त करावें, अशी आतां लोकांत चर्चा होऊं लागली. खुद्द पेशवे व नाना फडनवीस यांनीं त्यांस ताळ्यावर आणण्याकरितां सामोपचारानें होण्याजोगा होता तितका यत्न केला, हरिपंत फडक्यानींही " वडिलांचा लौकिक राहे ती गोष्ट करावी. पुण्यास यावें. श्रीमंतांच्या संनिध वास करावा ही गोष्ट सर्वोपरी आहे; " असा मधुर शब्दांनीं बोध केला. इतरांनींही नानाप्रकारे सांगितलें, परंतु त्यांचें तें खरें ! सरकारांतून फारच तंबी मिळाल्यास ते पुण्यास जात. चार सहा महिने तेथें रहातही. परंतु संसारांत व दौलतीच्या कारभारांत मन घालावें, दुर्व्यसनें सोडावीं, बायकोशी भांडूं नये व तिचा छळ करूं नये, हलके लोकांची संगत टाकावी, याप्रमाणें पेशवे व त्यांचे मुत्सद्दी त्यांस सांगत असत तें कांहीं त्यानीं ऐकिलें नाहीं!
 शेवटी इचलकरंजी संस्थानावर सरकारची जप्ती येणार व आपल्या नवऱ्यास कैदेंत रहावें लागणार असें ऐकून रमाबाईनीं आपण होऊनच रघुनाथराव कुरुंदवाडकरांच्या मार्फत पेशवे सरकारास विनंति केली की, " सरकारानें आमच्या यजमानांस कैदेंत ठेवावें व संस्थानची जप्ती करावी असा विचार योजिला आहे;