पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१३९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १२९ )
दुसरे व्यंकटराव नारायण.

तथापि शिंदे व भोसले यांचें पारिपत्य करण्यापुरती आपणाजवळ फौज नाहीं, आणखी सैन्य पाहिजें, असें व्यंकटरावानीं परशुरामभाऊस लिहिलें होतें.
 इंग्रज पराजित होऊन परत मुंबईस गेले तथापि त्यांचा धीर खचला नव्हता. मराठ्यांशीं लढण्याकरितां त्यांनी पुनः कंबर बांधिली. शिंद्यांच्या फौजेंत दादासाहेब होते तेथून निसटून ते पुनः इंग्रजाकडे गेले. इंग्रजांचा सेनापति जनरल गाडर्ड हा हिंदुस्थानांतून गुजराथेंत आला. त्याशीं लढण्याकरितां शिंदे होळकर गेले होते त्यांस त्यानें पिटून लाविलें व गणेशपंत बेहरे नांवाच्या सरदारावर छापा घालून त्याच्या फौजेची दाणादाण केली. नंतर गाडर्डसाहेबांनीं मुंबईस येऊन पावसाळा संपतां संपतां वसई, कल्याण, भिवंडी, पनवेल या तालुक्यांत अंमल बसविला आणि डिसेंबरांत वसईचा किल्ला घेतला. नंतर तो इंग्रज सेनापति घांट चढून पुण्यावर येऊं लागला. होळकर व फडके हे त्याच्या तोंडावर राहिले होते त्यांस त्यानें हुसकून लाविलें व घांट चढून खंडाळ्यास येऊन तळ दिला. त्या प्रसंगीं नाना फडनवीस यानीं इंग्रजांशी लढण्याकरितां सैन्याची खूप तयारी केली आणि कित्तूराकडे परशुरामभाऊ होते त्यांस आपणाकडे बोलावून नेलें. भाऊ पुण्यास जाऊन तेथून तळकोंकणांत गेले व मुंबईहून गाडर्डाकडे घाटावर रसद जात असे तिजवर ते दररोज तुटून पडूं लागले. त्यांची व इंग्रजांचीं दररोज निकरानें युद्धें होत असत. व्यंकटरावही करवीरचा शह सोडून तिकडेच गेले. त्यांनीं राजमाचीस बुनगें ठेवून सडे स्वारीनिशीं कल्याण परगण्यांत जाऊन तळ दिला होता. इंग्रजांशी लढाया होत त्यांत व्यंकटरावही आपल्या फौजेसह हजर असत, त्यामुळें त्यांचीं घोडीं व कित्येक माणसें जायां होऊन नुकसान झालें. मुंबईहून रसद येईनाशी झाली तेव्हां गाडर्डास घांट उतरून परत जाणें भाग पडलें.
१७