पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १२२ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

पांडुरंगराव व कोन्हेरराव पटवर्धन व व्यंकटरावदादा यांस आज्ञा केली. व्यंकटराव हे श्रीमंत दादासाहेबांस आणण्याकरितां पेशव्यांचे कारभारी दीड वर्षांपूर्वी गेले होते त्यांजबरोबर फौजेसह होते. पुढें दादासाहेब पुण्यास न येतां गुजराथेंत पळून गेले. तेव्हां कारभारी पुण्यास परत आले त्यांबरोबर व्यंकटरावही आले. करवीरकरांच्या स्वाऱ्या इचलकरंजीवर होत होत्या, तेव्हां व्यंकटरावांचा मुक्काम पुण्यास होता. तेथून तें नुकतेंच इचलकरंजीस आले होते. पेशव्यांच्या आज्ञेप्रमाणे व्यंकटरावदादा, भवानराव प्रतिनिधि वगैरे सरदारांस मिळाल्यानंतर ती फौज करवीरकरांवर चालून गेली. उभय सैन्यांची वडगांव मुक्कामीं गांठ पडून मोठें युद्ध झालें. त्यांत करवीरकरांचा पराजय झाला. नंतर या फौजेनें करवीरास वेढा घातला व तेथील आदितवार व मंगळवार या पेठा लुटून जाळून गंगावेशीस शंकराचार्यांचा मठ आहे तोही लुटला. त्या दिवशीं लढाई झाली तींत व्यंकटराव यांस हातावर व बावळ्यावर अशा दोन जखमा लागल्या. नंतर १००००० रुपये घेऊन करवीरचा वेढा उठवावा. बाकीच्या राज्यांत काय वाटेल तें करावें पण करवीरास उपद्रव देऊं नये, असें करवीरकरांचें बोलणें आल्यामुळें त्या फौजेनें वेढा उठविला. नंतर भवानराव प्रतिनिधि परत गेल्यामुळें रामचंद्र गणेश यांच्या कुमकेस परशुरामभाऊ व रघुनाथराव कुरुंदवाडकर आले व करवीरकराशीं लढाई तशीच पुढें चालू राहिली.
 तिकडे कर्नाटकांत हैदरअल्लीनें गुत्तीचा किल्ला घेऊन मुरारराव घोरपड्यांस कैद केलें व धारवाड प्रांतीं येऊन पटवर्धनांची जहागीर व सावनुरचें बहुतेक राज्य घेतलें. त्यांस हांकून लावण्याकरितां पेशव्यांनीं पांडुरंगराव व कोन्हेरराव पटवर्धन व कृष्णराव पानशे यांस पाठविलें.