पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३ )
कापशीकरांची थोडी हकीकत.

निजामशाहींतले सरदार जाधव व शिवछत्रपति ज्या कुळांत जन्मास आले ते भोंसले हेही देशमुखच होते.
 मुधोळकर घोरपडे शिवाजीमहाराजांचा अभ्युदय होत होता त्या वेळी त्यांशीं वैरभाव धरून विजापूरच्या बादशाहीस चिकटून राहिले, परंतु कापशीकरांची गोष्ट तशी नाही. यांच्या घराण्यांत त्या वेळी म्हाळोजी घोरपडे मुख्य होते. त्यांनीं बादशहाची चाकरी सोडून शिवाजीमहाराजांचा पक्ष धरिला होता. त्यांचें पांचशें स्वारांचें पथक होतें. या पथकानिशीं स्वारींत हजर राहून ते शिवाजीमहाराजांची एकनिष्ठेनें चाकरी करीत असत. त्यांस संताजी, बहिरजी व मालोजी असे तीन पुत्र झाले. ते तिघेही पराक्रमी निघाले. तेव्हां शिवाजीमहाराजांनीं त्या तिघांस तीन स्वतंत्र पथकांची सरदारी सांगून त्यांची चाकरी हंबीरराव सेनापतीच्या निसबतीस लावून दिली. त्या तिघां भावांत शूरत्वाविषयीं संताजीरावांचा नांवलौकिक विशेष झाला होता. सन १६७७|७८ सालीं शिवाजीमहाराजांची कर्नाटकांत चंदीचंदावराकडे मोहीम झाली तींत हंबीरराव सेनापति होते. तिकडून ते सेनापति परत स्वदेशीं येत असतां त्यांनीं तुंगभद्रच्या तीरावरचा मुलूख व त्यांतले कोपळ, बहादुरबिंडा, गजेंद्रगड वगैरे प्रसिद्ध किले घेतले. तो मुलूख विजापूरच्या बादशहांचा असल्यामुळें त्यांनीं सेनापतीच्या पारिपत्याकरितां एकामागून एक दोन फौजा पाठविल्या. परंतु सेनापतींनी त्या दोन्ही फौजांचा पराजय करून त्यांतलें मुख्य सरदार धरून कैद केले. त्या दोन युद्धांत संताजी व बहिरजी घोरपडे यांनीं फार पराक्रम केला. त्यावरून शिवाजीमहाराजांनीं प्रसन्न होऊन त्या दोघां बंधूस तों नवीन जिंकलेला मुलूख जहागीर दिला. ही गोष्ट घोरपड्यांच्या इतिहासांत एक प्रकारें महत्वाची आहे. कारण कीं, त्या दिवसा