पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१२८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ११८ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

 इतकें झालें तरी अनूबाईनीं न डगमगतां पूर्वी सांगितल्याप्रमाणें राजमंडळाच्या दोन स्वाऱ्या परतून लावल्या, पण असें नेहमी होऊं लागल्यास आपला निभाव लागणार नाहीं; व दादासाहेब, हैदरअल्ली व इंग्रज यांशीं लढण्यास जोपर्यंत पुणें दरबार गुंतलें आहे तोपर्यंत आपणांस तिकडून विशेष मदत व्हावयाची नाहीं हे त्यांस कळत नव्हतेंसें नाहीं. करवीरकरांची ही दुसरी स्वारी परत गेल्यावर त्यांशी अनूबाईंनीं तहाचा संदर्भ लाविला. परंतु करवीरकर अपजयामुळें चिडून गेले होते व लढण्याची खुमखूम त्यांची अद्यापि मोडली नव्हती. या वेळीं ते इचलकरंजी संस्थानाच्याच राशींस लागले होते असें नाहीं. पंतअमात्ये व पंतप्रतिनिधि यांच्याही संस्थानांस त्यांचा उपद्रव सुरूच होता. राणोजी घोरपडे सेनापति यांस तर त्यानीं फारच जेरीस आणिलें होतें. खडकलाट, पट्टणकुडी व गडइंग्लज हीं सेनापतचीं ठाणीं त्यांनी बळकाविलीं होतीं इतकेंच नाही, तर आत बाकीचें सर्व संस्थानही आमच्या हवालीं करून तुम्हीं कृष्णापार निघून जावें असें ते त्यांस म्हणू लागले होते ! पेशव्यांच्या मुलखावरही स्वाऱ्या करण्यास ते मागें पुढे पहात नसत. चंदगडें म्हणून पेशवे सरकारचा एक तालुका होता त्यावर त्यांनी घासदाण्याबद्दल एक लाख रुपयांची मागणी केली होती ! करवीरकाराशीं होतां होईल तों सलोखा राखावा ही सखारामबापू व नाना फडणवीस यांची मनापासून इच्छा होती. पण त्यांच्या आगळकीबद्दल चोहोंकडून बोभाटे येऊ लागले तेव्हा त्यांच्या पारिपत्याकरितां फौज पाठविण्याशिवाय पुणें दरबारास गत्यंतर नाहीं असें झालें !
 सन १७७५ च्या एप्रिल महिन्यांत करवीरकरमहाराजांची स्वारी आजरें तालुक्यावर होऊन त्यानीं उत्तूरचे ठाणें घेतले व तिकडील दुतर्फी गांवांतून इचलकरंजीकरांचे लोक होते ते हाकून लाविले