पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१२०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(११०)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

सोडवून परत दिले तेव्हां कोल्हापुरकरांनीं या दोन्ही गांवांत ठाणीं घातली. नंतर त्यांपासून चिकोडी मनोळी परत घेण्याकरितां या पेशव्यानीं सन १७७० सालीं रामचंद्र नाईक परांजपे व भिवराव पानसे यांजबरोबर तोफखाना व फौज पाठविली. त्यानीं ते तालुके घेतले तेव्हां पुनः लाट व रांगोळी या गांवांत इचलकरंजीकरांचीं ठाणी बसली.
 सन १७७२ च्या फेब्रुवारींत जिजाबाई मरण पावल्या. त्या बाईचा स्वभाव अग्नीप्रमाणें प्रखर असून त्यांचीं शासनें फार कडक असत. स्वकार्य साधण्याविषयीं त्यांस एखादा मार्ग पसंत पडला म्हणजे तो योग्य आहे किंवा अयोग्य आहे हें त्या पहात नसत. राज्यांतल्या जमीदार लोकांस व सरदारांस त्यांचा फार उपद्रव होत असे. तत्कालीन पत्रव्यवहारांत त्या बाई ब्रह्मद्वेषी होत्या असें क्वचित लिहिलें आहे. परंतु केवळ ब्राह्मणजातीसंबंधें त्यांच्या मनांत कांहीं विशेष


(पान १०१. वरून समाप्त.)

करवीरकरांपासून जबरीनें हे तालुके घेऊन आपले आप्त पटवर्धन यांस जहागीर दिले" असें डफ् साहेब लिहितात !!! पटवर्धनांस हे तालुके जहागीर होते ही गोष्ट साहेबांखेरीज कधीं कोणी ऐकिलेली सुद्धां नाहीं! जर ते त्यांस जहागीर असते तर त्यांस पेशवे सरकारांतून जहागिरीच्या मुलखाचे बेहडे निरनिराळ्या वेळीं करून दिलेले आहेत त्यांत कोठेंं तरी चिकोडी मनोळीचा निर्देश असता कीं नाहीं? परशुरामभाऊंकडे या तालुक्यांतले बरेच टापू काही वर्षे होते हे खरें, पण ते करवीरकरांकडून कर्जाच्या फेडीबद्दल होते. पेशव्यांकडून जहागीर म्हणून नव्हते! पटवर्धन हे माधवराव पेशव्यांचे आप्त होते ही या साहेबाची अजब माहिती वाचून हंसूं येतें !!! स. १८५३ च्या सुमारास बाजीरावसाहेबांची कन्या बापूसाहेब कुरुंदवाडकर यांस दिली त्यापूर्वी पेशवे-पटवर्धनांचा संबंध कांही एक नव्हता! याच ठिकाणी डफ् साहेबांनी रामचंद्र गणेश याचे नांव रामचंद्र हरि लिहिले आहे ती चूक व त्या 'रामचंद्र हरी'चा येसाजी शिंद्यानें पराभव केल्याची खोटी माहिती डफ् साहेबांनी लिहिली आहे ती चूक पूर्वी आम्हीं अधिकार-योग पृ० ६२ येथे टिपेंत दाखविलीच आहे. एकाच प्याऱ्यांत इतक्या चुका करणाऱ्या डफ् साहेबांची तारीफ काय वर्णावी !