पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१११

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०१
नारायणराव व्यंकटेश.

सावनूरचा नबाब मिळून हैदराच्या फौजेशीं टक्कर द्यावयास उभे राहिले असतां सर्वांचा पराजय होऊन त्यांस पळ काढावा लागला होता. शत्रूच्या फौजेनें धारवाडच्या सुभ्यापैकी सर्व ठाणीं घेऊन खुद्द धारवाडास वेढा घातला तेव्हां किल्ल्यांत कुमक पोंचवावी म्हणून विसाजी नारायण, हरिराम व मेघश्यामराव हे तिघे गेले. तों शत्रूनें अकस्मात येऊन त्यांजवर छापा घातला व मेघश्यामरावास धरून नेलें व विसाजीपंत व हरिराम मात्र मोठ्या शर्थीने जीव बचावून पळून नरगुंद येथें आले. धारवाडचा सुभा हातचा गेल्यामुळें इचलकरंजीकरांचे नुकसान फार झालें. यापूर्वीं याच वर्षी मर्दनगड किल्ला व त्या खालचा मुलूख पोर्च्युगीज लोकांनीं त्यांजपासून हिसकावून घेतला होता ती नुकसानी झाली होतीच, त्यांत ही आणखी प्रस्तुत भर पडली.
 याप्रमाणें हैदराचें प्राबल्य फार वाढल्यामुळें पेशव्यांस त्यांचें पारिपत्य करणें प्राप्त झालें व खुद्द पेशवे फौजेची उत्तम तयारी करून कर्नाटक प्रांतीं येण्यासाठी सन १७६४ च्या प्रारंभी पुण्याहून निघाले ते महादेवावरून कृष्णातीरी आले. तेथून पुढें करवीरवासी जिजाबाई साहेब यांजकडून पांच लक्ष रुपये खर्चास घेऊन त्यांचीं काहीं ठाणीं पंडपाळेगारांनीं बळकाविली होतीं ती पुन्हां त्यांच्या हवाली करून देऊन ते मनोळीस गेले. इचलकरंजीचें पथक विसाजीपंताबरोबर नरगुंदास होतें तें या लष्करास येऊन मिळालें. मराठे समीप आलेसें पाहून हैदर झाडींत शिरला. जुनी व नवी हुबळी घेऊन पेशवे सावशी कुंदगोळाकडे आले. गोपाळराव पटवर्धन, विसाजी नारायण व धायगुडे यानीं गदग घेतलें व शिरहट्टीस मोर्चे लाविले. नंतर हैदराशीं रटेहळ्ळी येथें पेशव्यांनी लढाई करून त्याचा पराजय केला व तुंगभद्रेअलीकडचा सर्व मुलूख ताब्यांत घेतला. त्या वर्षी सर्व