पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/११

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

प्रकरण पहिलें.

कापशीकर घोरपडे यांची थोडी हकीकत.

≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈

 इचलकरंजी संस्थानाचा मूळ उगम कापशी संस्थानापासून असल्यामुळें कापशीकरांची थोडी हकीकत प्रस्ताविक रीतीनें आरंभी देणें इष्ट वाटतें.

 उत्तरहिंदुस्थानांत यवनांचें प्राबल्य झाल्यामुळें राजपुताना, माळवा, बुंदेलखंड या प्रांतांतील हजारों रजपूत घराणीं दक्षिण देशीं रहावयास आली व या महाराष्ट्रांत गांवोगांव पाटिलक्या वगैरे वतनें संपादन करून राहिली. या लोकांस 'मराठे' असे नांव असून त्यांची शाण्णव कुळे आहेत अशी प्रसिद्धि आहे. त्या सर्वांत अत्यंत श्रेष्ठतेस पोंचलेले घराणे भोसल्यांचें आहे व त्याचा विस्तार सर्व महाराष्ट्रदेशभर पसरला आहे.भोसल्यांचें मूळ पुरुष उदेपुरच्या राजकुलापैकीं होते असें म्हणतात. शककर्ते शिवाजीमहाराज यांचा जन्म याच कुळांत झाला.

 भोंसल्यांच्या कुळाच्या एका शाखेस ‘घोरपडे' असें आडनांव आहे. असें आडनांव पडण्याचें कारण असे सांगतात कीं, बहामनी बादशहांच्या कारकीर्दीत घोरपडयांच्या कोणा पूर्वजानें घोरपड म्हणून एक जनावर असतें त्याच्या साधनानें एका किल्ल्याचा तट चढून तो किल्ला घेतला व त्या दिवसापासून त्यास व त्याच्या वंशजांस घोरपडे असें आडनांव पडलें, घोरपडयांची घराणी महाराष्ट्रांत असंख्य आहेत परंतु त्यांत कापशीकर व मुधोळकर घोरपडयांचींच काय तीं