पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१०३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ९३ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

साहेब व भाऊसाहेब यांच्या नांवानें खडे फोडीतच होत्या. या नुकत्याच वारल्या तेव्हांही ' हे मेले माझ्या देखतच उलथून पडले, यानें माझ्या डोळ्यांचें पारणें फिटलें. आतां मी सुखानें मरेन ! ’ हे त्यांचे शेवटचे शब्द होते ! त्या काळच्या लोकांचा देवधर्मावर विश्वास फार असे. ज्यानीं मूळ मराठी राज्य स्थापलें त्या शिवाजीमहाराजांची सून व राजाराम महाराजांचें कुटुंब ताराबाई. एका वेळीं त्या बाईनीं स्वतः राज्य केलें होतें. ज्या रामराजांस छत्रपति म्हणून गादीवर बसविलें होतें तेही त्यांचेच नातू. राज्याचा कारभार करण्याचा आधिकार वास्तविक ताराबाईंचा असतां आपण त्यांचा धनीपणा कांहींच चालूं दिला नाही, यामुळें त्यांचा शाप लागून पानपतचा पराजय व नानासाहेबांचा मृत्यु वगैरे अनर्थ ओढवले, असें पेशव्यांच्या कुटुंबांतील व दरबारांतील लोकांच्या मनांत कांहीं तरी खवखवत असावें ! अशा त्या प्रसंगी जिजाबाईनीं दरबार भरवून पेशवे व रघुनाथराव व सखारामबापू वगैरे सर्व मंडळीस स्पष्ट सांगितलें कीं, " मी दत्तक घेऊन माझ्या सर्व राज्याचा कारभार पूर्वीप्रमाणे मी स्वतः करणार. हा दत्तक तुम्ही कबूल करीत असाल व करवीरचें राज्य मजकडे राहू देत असाल तर बरें. तसें नसेल तर आपण करवीरास परत न जातां याच पायीं काशीयात्रेस जाणार ! राज्याचें वाटेल तें तुम्ही करावें ! " नानासाहेबांच्या कारकीर्दीचा शेवट दु:खांत झाला याला ताराबाईचा शाप हे कारण ज्यांना सुचलें असेल त्यांना त्या पेशव्यानीं कोल्हापूरचें राज्य घेण्याची वासना धरिली हेंही कारण सुचलें असेलच ! तात्पर्य, शिवाजी महाराजांच्या नातसुनेने माझ्या राज्याची मी अमुक अमुक व्यवस्था करणार ही तुम्हास कबूल आहे की नाहीं, असें भर दरबारांत विचारलें तेव्हां नाहीं म्हणण्याचें धाडस त्या वेळीं कोणास झालें नाही !!! बाईसाहेबांच्या म्हणण्यास सर्वानीं संमति दिली. याप्रमाणे