पान:आमची संस्कृती.pdf/81

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

७४ / आमची संस्कृती

 आज प्रत्येकाच्या तोंडी असलेल्या काही विषयांचा येथे उल्लेख केला तर हा मुद्दा समजण्यास मदत होईल.

 सर्व मनुष्यजातीमध्ये बुद्धीचे सारखेच प्रमाण
 कॉलेजचे शिक्षण घेण्यास कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे.ह्याबद्दल आज बराच वादविवाद चाललेला आहे. स्वत:ला बहुजनसमाजाचे पुढारी म्हणविणाऱ्या बच्याच जणांना असे वाटते की,कॉलेज-प्रवेशासाठी लागणारे गुण शक्य तितके कमी व विषय कोणतेही असले तर बरे, कारण त्यामुळे बहुजन समाजातील खूप मुले कॉलेज शिक्षणाचा लाभ घेऊ शकतील व मागासलेल्या लोकांना पुढे येण्यास वाव मिळेल. दिसायला हा युक्तिवाद बिनतोड आहे,पण त्यात गृहीत धरलेल्या काही गोष्टी वस्तुस्थितीला धरून नाहीत व अपेक्षिलेला लाभ, लाभ न ठरता अंती हानी पदरात पडण्याचाही संभव आहे. काही लोकांनी बहुजन समाजाचे नाव पुढे करून शाळेतले इंग्रजी शिक्षण अगोदरच कमी करून टाकले आहे.
 ह्या युक्तिवादातले पहिले गृहीत असे की, बहुजन समाजाला काही अभ्यासक्रम व काही विषय झेपणारे नाहीत.अगदी बरोबर हाच युक्तिवाद ५०/७५ वर्षांपूर्वी इंग्रज राजकर्त्यांनी काळ्या लोकांविषयी केला होता. त्या वेळी तो उघड उघड कुटिल म्हणून धुडकावून टाकला. कारण तो परकीय राजसत्तेने केलेला होता. आता हा युक्तिवाद आप्त करीत आहेत व तो स्वत:च्या लोकांविषयी करीत आहेत. युक्तिवादापेक्षा त्यांत तथ्य काडीचेही नाही. अमक्या जमातीची मुले जास्त बुद्धिवान पण पूर्वीच्या अमक्याची कमी असे आतापर्यंत तरी झालेले नाही. उलट, बुद्धी मनुष्यजातीमध्ये सारख्या प्रमाणातच दिसून येते, असाच अर्वाचन शास्त्राचा निष्कर्ष आहे. पूर्वी मॅट्रिकच्या परीक्षेत ठराविक विषय असत ते सर्वांनी घेतलेच पाहिजेत असे होते. आता मुलांना विषय निवडता येतात व बऱ्याच विषयांचा (संस्कृत, गणित, इंग्लिश) अभ्यासक्रमही पूर्वीपेक्षा सोपा आहे. हे मी ऐकून सांगत नाही. मी स्वत: जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे परीक्षा पास झाले व तीन मुलांना मॅट्रिकचे विषय शिकविलेले आहेत. कॉलेजात मात्र उत्तरोत्तर पहिल्या वर्षापासून एम..पर्यंत शिक्षणक्रम काही