पान:आमची संस्कृती.pdf/46

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / ३९

४. भारतातील वन्य समाज

भारतातील एकंदर लोकसंख्या ३६,११,५१,६६९ (छत्तीस कोटी, अकरा लक्ष, एकावन्न हजार, सहाशे एकूणसत्तर) इतकी आहे (१९५१). त्यांपैकी शेकडा १७.३ टक्के शहरांत व शेकडा ८२.७ टक्के म्हणजे २९,८६,७२,४३० (एकोणतीस कोटी, शहाऐंशी लक्ष, बहात्तर हजार, चारशे तीस) ग्रामीण विभागांतील आहे. ह्या ग्रामीण विभागापैकी २,२५,११,८५४ (दोन कोटी, पंचवीस लक्ष, अकरा हजार, आठशे चौपन्न) रानात राहणारे * आदिवासी आहेत. म्हणजे १९५१ साली भारतातील लोकसंख्येत शेकडा पाच लोक आदिवासी किंवा वन्य म्हणून गणले गेले. ग्रामीण जनतेच्या मानाने हे प्रमाण ८ टक्क्यांपेक्षा थोडे जास्त आहे.
आदिवासी सर्व भारतभर सर्व प्रांतांतून सारख्या प्रमाणात विखुरलेले नाहीत. काही प्रांतांतून आदिवासी जमाती अत्यल्प प्रमाणात आहेत; पंजाब व उत्तर प्रदेशच्या सपाट मैदानात ते जवळजवळ नाहीत. केरळ, मद्रास, म्हैसूर ह्या प्रदेशांतून त्यांची संख्या दीड लाखांच्या आतच आहे.
  • मुंबई येथील जी.एस.घुर्ये ह्यांचे या विषयावरील Aborigines, so-called and Their future— Poona 1943 हे पुस्तक जिज्ञासूंनी वाचावे.