पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जातिप्रथा, धर्मांधता, विवाह पद्धती, विषमता इत्यादींच्या संदर्भात जनजागृती करून समाजाला पुरोगामी बनविले.
 महात्मा फुले यांनी सन १८४८ मध्ये स्त्री शिक्षणापासून आपल्या सामाजिक जीवनास प्रारंभ केला. त्या वेळी स्त्रियांनाही शिक्षणाचा अधिकार आहे, हे मान्य नव्हते. पण फुले यांचा विचार होता की जोपर्यंत स्त्री शिक्षित होत नाही तोपर्यंत संपूर्ण समाज शिक्षित होणार नाही. समाजाला पुरोगामी बनविण्यासाठी स्त्रीचं फक्त शिक्षित होणं आवश्यकच नाही तर अनिवार्यसुद्धा आहे, हे समजून त्यांनी सन १८४८ मध्ये पुण्यात महाराष्ट्राच्या पहिल्या कन्या विद्यालयाचा प्रारंभ केला. या कार्याची प्रेरणा त्यांना ख्रिश्चन मिशनच्यांकडून मिळाली. ही शाळा उघडण्यापूर्वी त्यांनी ख्रिश्चन मिशनच्यांच्या अनेक संस्थांच्या प्रशालांचा अभ्यास केला. त्यांच्या या प्रयत्नांस सनातनी लोकांनी यश येऊ न देण्याचा शक्य होईल तितका प्रयत्न केला. पण महात्मा फुले जरासुद्धा डगमगले नाहीत. त्यांनी दलित मुलींसाठी उघडलेल्या या शाळेत शिकविण्याची जबाबदारी आपली पत्नी सौ. सावित्रीदेवींच्यावर सोपविली. त्या स्वतः अशिक्षित होत्या. पण फुल्यांनी त्यांना शिकवून शिकविण्यास योग्य बनविले. फुल्यांच्या विचारानुसार शिक्षण हा प्रगतीचा मूलभूत पाया आहे. शिक्षणाचं असाधारण महत्त्व स्पष्ट करीत त्यांनी आपला ग्रंथ ‘शेतक-यांचा आसूड' मध्ये म्हटलं आहे की,

 विद्येविना मती गेली
 मतिविना नीती गेली
 नीतिविना गती गेली
 गतिविना वित्त गेले
 वित्ताविना शूद्र खचले
 इतके अनर्थ एका अविद्येने केले

 आपल्या या धारणेनुसार पुढे त्यांनी सन १८५१ मध्ये आणखी दोन शाळा उघडल्या. एकोणिसाव्या शतकात शिक्षणाचा प्रसार म्हणजेच एक कठीण कार्य होतं. या कार्यासाठी सरकारकडून कोणतीही मदत मिळत नव्हती. समाजातील अभिजात वर्गाच्या हातात सगळी आर्थिक साधने होती. त्यांचा दलित आणि स्त्री शिक्षणाला जबरदस्त विरोध होता. अशा स्थितीत महात्मा फुले यांनी ज्या चिकाटीने शिक्षणाचा मंत्र जागृत केला, तो पाहून इंग्रजसुद्धा प्रभावित झाले. तत्कालीन इंग्रज शिक्षणाधिकारी मेजर कॅडीने त्यांचे सार्वजनिक अभिनंदन केले.

 तो हा काळ होता तेव्हा स्त्रियांना आणि दलितांना कमी लेखले जाई. स्त्रीदास्यता ही महात्मा फुल्यांसाठी चिंता आणि चिंतनाचा विषय बनली

आकाश संवाद/५५