पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 कालच्या दिवाळीचा आजचा संदर्भ सर्वांनी लक्षात घ्यायला हवा. अंधार फार झाला, पणती जपून ठेवा' म्हणणारा कवीही मित्रांनो! दीपोत्सवाचेच महत्त्व सांगतो. आज दिवाळी हा संदर्भ हरवलेला केवळ एक जोश झाला आहे. ऋण काढून सण करताना आपण कधी भविष्याचा विचार करत नाही. फटाके उडवत असताना आपण हे विसरतो की ते तयार करताना अनेक बालमजुरांचे सोनेरी बालपण उद्ध्वस्त झालंय! प्रत्येक सणांचे आता आपण सांस्कृतिक पुनर्मूल्यांकन करायला हवे! पूर्वी आपण निरक्षर होतो. आता साक्षर नि सुशिक्षित होऊ लागलेले आपण. आपणास कधी काळी केवळ चामडी डोळे होते. आता आपणास दृष्टी आलीय. सणांकडे पाहण्याचा प्रगत व नवा दृष्टिकोन आपण जोपासायला हवा. स्वातंत्र्याची गेली पन्नास वर्षे आपण अशीच घालवली. पुढील काळ तरी सुकर करू. साता उत्तराची सणांची ही कहाणी तो वर सुफळ संपूर्ण होणार नाही, जोवर आपण जुन्या सणांचे नवे संदर्भ शोधणार नाही.

 कोई न होगा भूखा, नंगा।
 सारा देश होगा भला, चंगा।।

आकाश संवाद/४४