पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/41

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कालची आणि आजची दिवाळी

 ‘दिवाळी सण हा मोठा, नाही आनंदा तोटा' असे सुरेख वर्णन लाभलेला उत्सव म्हणजे दीपावली! त्याची आपण सर्वच मोठ्या आतुरतेने वाट पहात असतो. असे असते काय या सणात? बाल नि अबालवृद्ध सा-यांना किती ओढ असते या आनंद पर्वाची! आपल्या देशात हा सण सर्वाधिक उत्साहाने साजरा केला जातो. देशातील सर्व प्रांतांत तो वेगवेगळ्या रूपात साजरा होतो. या सणामागे हजारो वर्षांची परंपरा आहे. हा सण साजरा करण्यामागे अनेक सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक संदर्भ आहेत. आपला देश शेतीप्रधान आहे. शेतात पिके डुलू लागतात. शेतकरी आनंदी होतो. सुगीचे दिवस म्हणून तर शेतक-यास आनंद पर्वणीचे असतात. सुगीच्या ऐन बहरात हा सण येतो. आश्विन व कार्तिक महिन्याच्या संधिकाळात येणारा हा सांस्कृतिक उत्सव होय. शदर ऋतूच्या मध्यास सारा निसर्ग नवचैतन्याने न्हाऊन निघालेला असतो. सृष्टीचक्राचा फेर बदलतो तो याच सणाने. पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल देणारा हा सण आहे. सहा महिन्यांची दीर्घ रात्र संपून दीर्घ दिवसांचे आनंददायी सत्र सुरू होते, त्याचा आनंद व्यक्त करणारा हा उत्सव होय. राम । चौदा वर्षांचा वनवास संपवून परत आल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ साजरा केला जाणारा स्वागतोत्सव म्हणजे दिवाळी! सम्राट अशोकाच्या दिग्विजयाप्रीत्यर्थ साजरा केला जाणारा हा दीपोत्सव! सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या राज्याभिषेकाचा तर हा आनंद सोहळा! धन्वंतरीचा जन्मोत्सव म्हणजे दीपावली! सर्व तहेच्या अमंगळाचा नाश होऊन मांगल्य वर्धनाची प्रार्थना करणारा हा सण खरं तर सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक समृद्धीची कामना करणारा लोकोत्सवच होय.

 दिवाळी हा सर्वाधिक मोठा सण आहे. तो पाच दिवसांपर्यंत चालतो. पहिल्या दिवशी ‘धनत्रयोदशी' असते. यमराजास प्रसन्न करण्यासाठी या

आकाश संवाद/४०