पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिसून येतो. आज आपले सारे जीवन भोगवादी व आत्मकेंद्री बनत असताना तर त्यांच्या कथात्मक साहित्याची महती प्रकर्षाने गरज म्हणून पुढे येते.

 मातृत्वात सामावलेले, आपसूक असलेले मांगल्य हे साने गुरुजींच्या कथांचं आणखी एक व्यवच्छेदक लखण होय. प्रौढत्वी निज शैशवास जपण्यातील निष्पापता त्यांच्या साहित्यात मनुष्य जीवनाला अतूटरित्या जोडते. साने गुरुजींच्या पुरुष हृदयात मातृत्वाचे बेमालूम कलम झाल्याची प्रचिती देणाच्या त्यांच्या कथा अनुभवणे हा ब्रह्मानंद असतो. कवितेत जसा मुखडा असतो, गायक तो आळवत श्रोत्यांमध्ये रुजवतो. साने गुरुजीदेखील आपल्या कथा साहित्यात माणुसकीच्या गहिवराचा मुखडा घेऊन येतात व रुजवत राहतात. त्यांच्या रुजवणीची वाचणाच्या कल्पनाही येत नाही. बिनटाक्याची शस्त्रक्रिया करणाच्या कुशल शल्यविशारदाचे कौशल्य घेऊन येणा-या गुरुजींच्या कथांचे व्रण मात्र चिरस्थायी असतात ते त्यातील अक्षर मानव मूल्यांमुळेच.

आकाश संवाद/३९