पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संध्याछाया भिवविती हृदया...!

 संध्याछाया आहे म्हातारपणाचं प्रतीक! संध्याकाळच्या वेळेस सूर्य पश्चिमेकडे वळतो. सूर्य पश्चिमेकडे जसा कलत जाईल तसा आपल्या सावल्या लांब होऊ लागतात. लांब सावल्या भयावह असतात. वीज गेली की आपण घरी दिवे लावतो. दिवे लावले की आपण जर दिव्याजवळ असू तर आपली मोठी सावली भिंतीवर पडते. अगदी दुप्पट, चौपट मोठी सावली पाहून घाबरायला होतं! म्हातारपणी म्हणे, माणसाच्या मनात मृत्यूची सावली अशीच सतत दबा धरून बसलेली असते. ती सावली संध्याछायेसारखी मोठी असते. म्हणून ‘संध्याछाया भिवविती हृदया' असे एका कवीने म्हणून ठेवलेय.
 पण तुम्हाला खरे सांगू का? आता संध्याछाया पूर्वीसारखी आपणास भीती दाखवत नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारणच उरले नाही. मला तर ‘संध्याछाया' आता ‘शुभछाया' वाटू लागली आहे. माणसाचे बालपण जसे मुंगी साखरेचा रवा' असते, तसे संध्याछायेचं जीवनही ‘अमृतकुंभ' बनते आहे. पूर्वी लोक म्हातारपणास घाबरायचे, ते आबाळ होण्याच्या भयाने. आता परिस्थिती किती तरी पालटली आहे. पूर्वी चाळिशी उलटली की लोक मानसिकदृष्ट्या वृद्ध होऊ लागायचे. तो काळ किती मागे पडला. त्या काळात सोळा-अठरा वयात लग्ने व्हायची. पंचविशीपूर्वी मुले होऊन जायची. चाळिशीत माणूस आजोबा व्हायचा. आता आजोबा होणे पन्नाशीच्या पुढे घडते. त्यामुळे चाळिशीचे भय दूर पळालेय. आता चाळिशी ‘वसंत ऋतू' होऊ पाहतो आहे.

 हल्ली आपल्या आहारात सुधारणा झाली आहे. आरोग्य सुविधा वाढल्यात. आपलं आर्थिक मान उंचावलेय. दीर्घजीवी औषधे आलीत. पूर्वी इतकी मुला बाळांची जबाबदारी वृद्धांवर राहिली नाही. त्यामुळे संध्याछायेचे भय मनातून काढून टाकायला हवे. त्यासाठी विकारी मनोवृत्ती टाळून मन ‘आनंद घन' बनवायला हवे. ‘दहा गेले पाच राहिले' असा विचार आपण करू लागलो की

आकाश संवाद/२०