पान:अस्पृश्य -विचार.pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ४ )

णार असेल, तर जसजसा मतपोष होईल तसतसा पुढाऱ्यांच्या तेजस्वितेचा उदय दिसू लागतो. पण वास्तविक ते मागल्यांच्या खांद्यावर उभे असल्यामुळेच त्यांच्यापेक्षा उंच दिसतात. ही गोष्ट लक्षांत घेतली म्हणजे पूर्वी ज्या ज्या माणसांनी या प्रश्नासंबंधाने प्रयत्न केलेले असतील त्यांची योग्यता पुरतेपणी कळेल व त्यांचा गौरव करण्याची बुद्धि जागी राहील असो, तर या विषयाच्या उचलीला काँग्रेस, गांधी व सुधारक यांनी जो हातभार लावला त्याविषयी किंचिन्मात्र उल्लेख केल्यानंतर परिस्थितीच्या सपाट्याचाही उल्लेख करणे जरूर आहे.
 परिस्थितीचा वारा अस्पृश्यांना अनुकूल असा फिरूं लागला. जर्मन युद्धापासून हरतऱ्हेचे बोध मनुष्य योनीला मिळाले. स्वतःच्या हितासाठीच वास्तविक ज्यांनी युद्ध आरंभिली त्यांनी ती अनाथांकरतां व दुबळ्यांकरतां आहेत असा गवगवा केला.कारण लोकांची सहानुभूति मिळवून आपलीं मर्मे लपवावयाची होती. त्या सहानुभूतीच्या बळावर व धडधडीत खोट्या भुलथापांवर लढाई तर मारली. संकटाच्या प्रसंगी सर्व सामर्थ्य एकवटावी म्हणून नेहमी असत्याने लडबडलेली जीभ सत्ये व उदात्त तत्वें बोलू लागली. सत्याने आणि उदात्त तत्वांनी शरण आलेल्यांना आश्रय देऊन संकटमुक्त केलें. पण मदतीला बोलावून आणलेला राजा जसा घरांतच तळ देऊन आपल्याला हवी तशी व्यवस्था करूं लागतों त्याप्रमाणे त्यांनी या मतलबखोरांच्या घरादारांची व वेलविस्ताराची व्यवस्था आपल्याकडे घेतली. स्वतंत्रता, न्याय, स्वयंनिर्णय इत्यादींना लबाडीने घरी बोलावून आणिले. पण या निष्ठुर तत्त्वांनी फसव्या लोकांवर विलक्षण सूड उगविला, त्यांच्या खुद्द घरी आणि त्यांनी बाहेर मांडलेल्या संसारांत आपलाच घुमारा सुरू केला. 'आमच्या राज्यावर सूर्य कधी मावळत नाही ' या गर्वोक्ति बाधक होतीलसें