पान:अस्पृश्य -विचार.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३५ )

गलतीत कोणा लोकांचे भाग्य कसे उदयास येईल हे खरोखरच अतर्क्य आहे! सध्याचा मनु तरी असा दिसतो की, सहस्रावधि वर्षे लोकांच्या सुखाकडे आणि वैभवाकंडे केवळ दुरून पाहत बसावे आणि आपण व आपली मुलेंलेकरे यांनी जन्मापासून मृत्यूपर्यंत अवमान आणि लाचारवृत्ति यांच्या घाणेऱ्या चिखलात रुतलेलें राहावें, अशा या दास्याच्या अवस्थेतून या मांगमहारादींचा उद्धार व्हावा. ही भाग्योदयाची वेळ ज्या त्रैवर्णिकांच्या विरोधसंगतीत त्यांना लाधली त्या त्रैवर्णिकांचे, इतिहासाच्या मोठ्या दृष्टीनें, अस्पृश्यांनी आभारच मानले पाहिजेत. मी या ठिकाणी भिन्न भिन्न मानववंशांच्या ज्या हालचाली आणि घडामोडी भूपृष्ठावर चालतात त्यांचा हिशेब म्हणून उंच भूमिकेवरून लिहीत आहे; अगदी आजच्या वादाला या किंवा त्या पक्षाला जमवून घेण्यासाठी लिहीत नाही. या मुद्याचे विवेचन शांतपणे वाचणे स्वाभिमान बळावलेल्या महारसुशिक्षितांस अशक्य आहे हे मी जाणून आहे. पण हा भूतकालीन गोष्टींचा आढावा आहे आणि त्या दृष्टीने त्याची किंमत ठरवावयाची आहे.
 दुसरे असे की, ज्या त्रैवर्णिकांवर अस्पृश्यांनी कहर केला त्याच त्रैवार्णिकांत भागवतधर्माचा संप्रदाय थेट महारवाड्यांत नेऊन पोचणारे विशाल अंतःकरणाचे संत-महंत उत्पन्न झाले. सर्व धर्मज्ञान अवघड संस्कृतांत आणि “ दूर उभा राहा " असे म्हणणाऱ्या गुरुजींच्या मुखीं असा प्रकार होता. पण महाराष्ट्रसंतांनी " संस्कृतातेहि पैजा जिंके " अशा मराठी भाषेत आणि सर्वांना मनमुराद लाभेल अशा बालबोध पद्धतीने तें देशभर खैरातून टाकले. इतकें की, जातोजात संत पैदा झाले आणि सामाजिक दृष्ट्या दूर ठेवलेल्यांनाहि संत म्हणून मान मिळू लागला. त्याचा अर्थ असा की, अस्पृश्य जातींना अभिमान वाटेशी एकेक विभूति त्यांच्यांत उत्पन्न झाली. चोखामेळा