पान:अस्पृश्य -विचार.pdf/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २४ )

मोबदला न देतां बोलावतात आणि नित्यप्रसंग त्यांच्याशीच असल्यामुळे जाणे भाग पडते, अशी तक्रार महारांनी केली. एके गांवीं शेतकरी लोक ठरावांपेक्षा जास्त कामें सांगतात आणि ती केली नाहीत म्हणून बलुतें देत नाहीत अशी तक्रार या लोकांनी केली. कांहीं कांही गांवी पाण्यासाठी ३।३ तास आक्रंदन करावे लागते; आणि वडार बेरडहि ज्या ठिकाणी पाणी भरु शकतात, तेथे आम्हांस पाणी भरू देत नाहीत म्हणून घाणरडे ओढे खोडे धुंडावे लागतात, अशी तक्रार ऐकू आली. एके ठिकाणी घोड्यावर बसून गांवांत फिरण्यास महारास सामाजिक रीत्या प्रत्यवाय आहे असे कळले. या तक्रारींची याद पुष्कळ मोठी देता येईल. एकंदरीत तक्रारींत अज्ञानजन्य अतिशयोक्तीचा कांहीं थोडा भाग असेल. पण तो वगळून सुद्धां अस्पृश्याला त्याचे जिणें अधिक सुखाचे करण्याला बाकीच्या प्रजेइतकीहि संधि नसल्यामुळे त्यांना हाल सोसावे लागतात, हे खरे आहे. एकाच सार्वजनिक वरवंट्याखाली आपण सगळेच सांपडलो आहोत; परंतु हा एक त्रैवर्णिकांच्या हातचा पोटवरवंटाहि त्याला डोक्यावर फिरवून घ्यावा लागत आहे त्यामुळे तो अयंत उद्विग्न होतो. आणि अशा उद्विग्नतेच्या काळी ज्या सुंदर धर्मतरुच्या गार छायाखाली त्याच्या संतप्त जीवात्म्याला विसावा मिळावा, तो धर्म त्याला तूं नीच आहेस असे सांगतो आणि धर्माचा उपदेष्टा गुरु त्याच्या जिवाला समाधानाचे भातुकें पोंचविण्याच्याएवजी सावलीच्याही विटाळाच्या भीतीने दहा कदमांवरून दूर पळतो.
 वास्तविक पहातां धर्म केवढे उपकार करतो पहा. समाजाचे धारण करून आपल्या पोटांतील प्रत्येक माणसाला जितकें जास्त सुख देता येईल तितके देण्याची खटपट करतो; अंगावर आलेल्या अस्मानी संकटांची कारणे त्याला पूर्वसंचितात शोधावयास लावून भविष्यत्काल सद्गुणाच्या जोरावर सुखाचा करता येईल