पान:अस्पृश्य -विचार.pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १४ )

विल्याशिवाय होणार नाही. पण सुशिक्षित म्हणून, ज्ञानी म्हणून, कर्तबगार म्हणून आणि जबाबदार म्हणून वरील समाजाकडे जास्त काम येणार हे उघड आहे.
 अस्पृश्यतेचा सामाजिकदृष्टया विचार बहुजनसमाजाला अत्यंत अप्रिय वाटण्यासारखा आहे यात शंका नाही. राजकारणाच्या मैदानांतच आधुनिक थोर पुरुष वावरत असल्यामुळे आणि राजकारणाच्या वेदना प्रत्यही दरघरी पोचत असल्यामुळे तोच विषय सर्वतोमुखीं असावा आणि सामान्य जनसमाजालासुद्धां प्रिय वाटावा हे बरोबर आहे. इतकेच काय, पण त्याच राजकारणाच्या दृष्टीने केलेला अस्पृश्यतेचा विचार समाजाला थोडा तरी पटण्याचा संभव आहे. त्यांत एका अप्रिय त्रयस्थाशी झुंज असल्यामुळे ईर्षेचा भर वाटेल ती गोष्ट समाविष्ट करून घेतो. कोणत्याहि संकटाच्या प्रसंगी विषमभाव बाजूस ठेवावेसे वाटतात, कारण कार्यसिद्धीची निकड लागलेली असते. पण जी गोष्ट लगबग व्हावी म्हणून केली जाते ती पायाशुद्ध आणि हेतुपुरस्सर केली जाते असे वाटत नाही. विषमता घालवावयासाठी मूलत: केलेला विचार तो नसतो. काही काळपर्यंत म्हणजे कार्यसिद्धि होईपर्यंतच तो टिकून राहील अशी शंका येते. लढाईच्या वेळी ढोलगें गळ्यांत अडकवून ' दादासाहेब, काकासाहेब, तुम्ही-आम्ही एक ' असें जें इंग्रज डोंबारी ओरडत होता ते त्याचे ओरडणे म्हणजे शुद्ध बाता होत्या हे युद्धानंतर विषमतेचा वेताळ पूर्वस्थळाला आला यावरून उघड दिसते. संकटें नाहींशी झाल्यावर, मारलेला अगर गति दिलेला नव्हे तर कुपीत घालून गाडलेला, झुटिंग पुनः वर मान करून चारहि खंडांत नाचूं लागला आहे, याचे कारण अगदी उघडे आहे. विषमता काढावयास इंग्रज प्रवृत्त झाला नव्हताच. आग लागलेल्या घरावर पाणी ओतावयास 'बाहेर' च्या मांगाला त्याने