पान:अर्धुक (Ardhuk).pdf/३४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "हितं कशापाई? तिचं कोन करनार?"
 "आय हाय की तिची. घरातच असती न्हवं? मी एकला तरी कुठवर करनार? तिला संबळू का पोरांचं बगू का काम करून पोटाला मिळवू?"
 "त्ये मला काय ठावं नाय. तुमी आपल्या गावी निऊन ठिवा तिला. तुमची बी मान्स हायती की. आता लगीन करून दिल्यावर आमची काय जबाबदारी? तुमचं तुमी बगून घ्या."
 आधी त्याला जबाबदारी घ्यायचीच नव्हती. पण पोरीची अवस्था बघून कणव आली असती तरी तिला घरात ठेवून घ्यायचं तिच्या सावत्र आईनं कधीच पत्करलं नसतं. दशरथच्या घरी पण तसं तिची देखभाल करील असं कुणीच नव्हतं. तेव्हा आहे इथंच राहून आला दिवस रेटायचा एवढंच करणं शक्य होतं. नकुसाची मुलगी नऊ-दहा वर्षांची होती. ती थोडीफार मदत करायची. आजारी झाल्यावर नकुसानं तिला भाकरी करायला शिकवलं होतं. पण आईला आधार देऊन बसतं करायचं, थोडंफार खाऊ पिऊ घालायचं, तिचं गू-मूत साफ करायचं हे सगळं काही पोरीला जमलं नसतं. दिवसभर काम करून उरल्या वेळात दशरथ आपल्या बुद्धीप्रमाणे, जमेल तशी बायकोची सेवा करीत होता. पण तोही वैतागला होता.
 काही दिवसांनी नकुसा आधार घेऊन बसू सुद्धा शकेनाशी झाली. तिची वरच्यावर कूस बदलायला पाहिजे, तिचं शरीर हलतं रहायला पाहिजे हे दशरथला माहीत नव्हतं आणि आळसापायी तिचं अंग पुसणं, कपडे बदलणं हे तर त्यानं सोडूनच दिलं होतं. मग तिला सगळ्याभर व्रण झाले, त्यात पू झाला. व्रणांची दुर्गधी इतकी वाढली की तिला बघायला कुणी येईनासं झालं. दशरथला आणि पोरांना सुद्धा ते असह्य व्हायचं.
 शेवटी मरणानेच तिला ह्या यातनांतून आणि विटंबनेतून मुक्ती मिळाली. तिला अशी सुटका नको होती. ती शेवटपर्यंत मी बरी झाले की अमकं करीन तमकं करीन असंच म्हणत होती.
 दशरथ आता परत लग्न करायची भाषा बोलतोय. मुलांचं तो एकटा कसं बघणार? शिवाय भाकरी करून घालायला कुणी तरी हवंच.

॥अर्धुक॥
॥२९॥