पान:अर्धुक (Ardhuk).pdf/२७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "मी आल्यापास्नं बगितलं न्हवतं तुमाला गेल्यालं"
 "तर काय. लई दिसात गेले न्हवते म्हणून बोलावलं व्हतं यिऊन जा म्हणून."
 "कुणी बोलावलं?"
 "मंजी? शांताबाईनं."
 "मी म्हटलं दुसऱ्याच कुणी."
 सीतेला ह्याचा अर्थच कळला नाही. पण मग तो दुसराच काही तरी विषय काढून बोलायला लागला तेव्हा तिनं ते तेवढ्यावर सोडलं.
 पुन्हा संजय एक दिवस म्हणाला, "काल कोण आलं व्हतं तुमच्याकडे?"
 "का वं? रामभाऊ व्हते."
 "असं कुठल्यातरी पुरुषमाणसानं आवशी तुमच्याकडे येणं बरं दिसत न्हाई."
 "तो कुठलातरी न्हाई. मला भैण मानली हाय त्यानं." संजय मोठ्याने हसला.
 "हसताय कशापाई? खरं तेच सांगतेय."
 "असल्या गोष्टीवर कुणाचा इस्वास बसत नसतो मामी. तुमी एकल्या बाईमाणूस. तुमाला येवडं कळू नाई?"
 "एकली कशी? राजा हाय की."
 "काल व्हता का?"
 "आंदी नव्हता. तालमीत गेलावता. मंग आलाच की."
 ह्यावर संजय काही बोलला नाही. चांगला शहाणासुरता, सरळ वागणारा माणूस एकदम असं का करायला लागला सीतेला कळेना. पण त्याबद्दल रागवावं तर दुसऱ्या दिवशी जणू काही वेगळं घडलंच नाही असं गोडीत वागायचा. जाऊ दे म्हणून ती सोडून द्यायची. एकदा ती रात्री कुठेतरी गेली होती. तर परत आल्यावर राजूने तिला सांगितले, दाजी येऊन विचारीत होते मामी कुठे गेल्यात, कुणाकडे गेल्यात म्हणून. ती तडकली. दुसऱ्या दिवशी तिनं संजयला विचारलं, "तुमी का लई चवकशा करता मी कुठं जाते म्हणून? मला कुणाची चोरी हाय का काय कुटंबी जायला?"

 संजय अगदी साळसूद चेहरा करून म्हणाला, "मी कुठं काय म्हणतोय?

॥अर्धुक॥
॥२२॥