पान:अर्धुक (Ardhuk).pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आधी भावजय जरा नाराज होती. पण रखमानं तिच्या कलानं वागून घरातलं बरंच काम आपल्या अंगावर घेऊन तिची कुरकुर बंद केली. शिवाय महिन्याची महिन्याला व्याजाची रक्कम येत होती ती रखमा सरळ भावाच्या हवाली करायची. त्यामुळे भावावर तिचा भार पडत नव्हता. उलट भावाच्या संसाराला हातभारच लागत होता.
 काही वर्षांनी भावाची धाकटी मुलगी लग्नाला आली. भाऊ तिला म्हणाला, "पोरीचं लग्न काढलंय तुला ठाऊकच आहे. आज पैशाची गरज आहे. नाहीतरी तू माझ्या आधारानंच रहातेस, मग तुझे पैसे मला द्यायला काय हरकत आहे?" रखमाला नाही म्हणता येईना. तिनं जमीन खरीदणाऱ्याकडनं आपली ठेव काढून आणली, भावाच्या हवाली केली. त्याच्या मुलीचं लग्न थाटात झालं. भाऊ-भावजयीनं तोंड भरून रखमाचं ऋण मानलं.
 पण लग्नासाठी कर्जही काढलं होतं त्याचे हळूहळू तगादे लागायला लागले. शिवाय आता रखमाचे नियमित येणारे पैसे बंद झाले होते. भावाची ओढाताण व्हायला लागली. रखमाच्याही प्रकृतीच्या तक्रारी सुरू झाल्या. औषधपाण्यावर खर्च व्हायला लागला. घरकामात तिच्याने पूर्वीइतकी मदत होईना. शेवटी खायला काळ नि भुईला भार झालेल्या बहिणीला भाऊ म्हणाला, "माझा मलाच संसार जड झालाय. इतकी वर्ष मी तुला संभाळलं, इथून पुढे संभाळणं माझ्यानं होणार नाही. तू आपली दुसरीकडे जा."
 तिच्या बहिणीचा मुलगा शहरात शिकायला ठेवला होता.खोली भाड्याने घेऊन रहात होता. त्याच्या आईने विचार केला, ही म्हातारी त्याच्याजवळ राहिली तर त्याला करून घालील.खाणावळीच्या खर्चात दोघांचं पोट निघेल. शिवाय पोरगं एकटंच शहरात रहातंय, बहकेल, वाईट संगतीला लागेल. ही असली तर हिचा थोडा धाक राहील. तेव्हा रखमानं बहिणीकडे आसरा मागितला तशी बहीण म्हणाली, "माझ्या पोराजवळ राहून त्याला करून घालशील का?" रखमा कबूल झाली. तिला दुसरा मार्गच नव्हता.

 भाचा दुकानची खरेदी, भाजी-बिजी आणून द्यायचा. रखमा बसत उठत स्वैपाक, भांडी-धुणी करायची. रोज सकाळी उठताना देवाचं नाव घेत त्याला साकडं घालायची, "इट्टला, असंच काम रेटता रेटता येक दीस मला न्हेरे माज्या बाबा. न्हायतर ह्या पोराला माजा उपेग हायला न्हाई मंजी मी कुनाच्या दारात जाऊ?"

॥अर्धुक॥
॥१४॥