पान:अर्धुक (Ardhuk).pdf/१०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आईला बरंच वाटलं.घरातल्या कुरबुरीपासून थोडे दिवसतरीसुटका. जाताना उषा म्हणाली, "जाते आई, तब्बेतीची काळजी घे, काही लागलं तर कळव." तिच्या डोळ्यात पाणी आलं. आईला सोडून इतक्या लांब जाताना तिचा जीव कासावीस होत होता. सावित्रीबाई फक्त म्हणाल्या, "नीटपणे रहा. वेडंवाकडं बोलू नको. सांगतील ते काम मुकाट्याने कर, नाहीतर हाकलून देतील तुला."
 मुंबईत उषाचं चांगलं जमलं. समज जरा कमी आहे, पण मुलगी कामसू आहे, विश्वासू आहे असं म्हणून तिच्या मालकिणीने बाळंतपण करून मुलगी परत गेली तरी तिला ठेवून घेतली. उषा घरी नियमितपणे पैसे पाठवायची, अधूनमधून सुट्टीसाठी घरी यायची. अरुण शेवटी माणसात येऊन शाळेत जायला लागला हे पाहून तिला बरं वाटलं. शाळा पास होऊन अरुणने कॉलेजात नाव घातलं. तो पायजम्याऐवजी पँट-शर्ट घालायला लागला, सलूनमधून केस कापून घ्यायचा, मित्रांबरोबर फिरायचा. त्यांची सुस्थिती बन्याच अंशी उषाने पाठवलेल्या पैशांमुळे होती. पण आईनं कधी, 'आलीस? ये,' असं म्हणून उषाचं स्वागत केलं नाही. अरुणच्या कपाळाला तर बहिणीला पाहिलं की आठ्याच पडायच्या. ती अजागळासारखी रहायची,खेडवळासारखी मोठा आवाज काढून बोलायची, शिव्या द्यायची. एकदा तिनं रस्त्यात त्याला हाक मारली होती. त्याच्या बरोबर त्याचे मित्र होते. एकजण म्हणाला, "कोण पाखरू आहे रे?" अरुण आंबट तोंड करून म्हणाला, "बहीण आहे माझी."
 "काय लेका, काय वाटेल ते सांगतोस. आम्ही तुझ्या घरी येतो तेव्हा कधी दिसली नाही ती."
 "मुंबईला असते."
 घरी आल्यावर त्यानं तिला खूप दम दिला, "दुसऱ्या कुणासमोर मला ओळख देत जाऊ नकोस," म्हणून.
 "का?"
 "उलट विचारायचं काम नाही."
 "तुला लाज वाटते माझी?"
 "हो, हो वाटते"

 "मग आईची पण वाटत असेल."

॥अर्धुक॥
॥५॥