पान:अभिवादन (Abhivadan).pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


७२ । अभिवादन



त्याच भूमिकेला नाही. पण आपण कंटाळवाणेपणाचा कुठेतरी रसव्यवस्थेशी संबंध जोडून उद्वेग या नावाचा रस मानला पाहिजे. दहा कादंबऱ्या चांगल्या असतात. त्यांच्या शेजारी हजार गचाळ कादंबन्यांचे गळे असतात. ते सगळे लिखाण कंटाळा आणणारेच असते, उद्वेगजनक असते. अशा वेळी आपल्याला इथे रसनिर्मितीचा कवीचा प्रयत्न फसला आहे असे म्हणता येणार नाही. उलट रसिकांच्या प्रत्ययांच्या आधारे उद्वेग रसनिर्मितीचा कवीचा हेतू सफल झाला आहे असे मानावे लागेल. ज्या वेळेला विश्वामित्र हरिश्चंद्राचे सत्त्व पाहतो त्या वेळी हरिश्चंद्राला अनुसरून तिथे रस दानवीर मानायचा की प्रेक्षकांना अनुसरून त्या ठिकाणी प्रेक्षकांना राग येतो म्हणून रौद्ररस मानायचा, हे सांगता येणे कठीण आहे. संस्कृतमधील रसव्यवस्था नायकाचा विचार केल्याशिवाय स्पष्ट करता येत नाही. म्हणून नायक-विचार मानलाच पाहिजे, असे कधी कधी मला वाटते. आणि नायक-विचार जर आपण मान्य केला तर संस्कृत रसव्यवस्था स्पष्ट करता येत नाही म्हणून तो विचार आपण सोडून दिला पाहिजे, असे मला वाटते. मी विचारले, काव्यगत नायकाचा मुद्दा सोडला तर मग विभाग, अनुभाव प्रेक्षकाचे समजायचे काय ? कहाळेकर म्हणाले, काव्यगत नायकाचा मुद्दा मान्य केला तर त्यानंतर स्थायीभाव, संचारीभाव, विभाव, अनुभाव सगळेच काव्यगत मानावे लागेल किंवा प्रयोगांतर्गत मानावे लागेल. तसे मानल्यानंतर रस प्रयोगात असतो; प्रेक्षकाच्या मनात नसतो असे म्हणावे लागेल. रस प्रेक्षकाच्या मनात नसतो हे मान्य केल्यानंतर प्रमाण रसचर्चा अप्रमाण ठरेल आणि असे ठरल्यानंतर आपण चर्चा कशाची करणार ?
 रससूत्राविषयी बोलताना ते म्हणाले. या रससूत्रात स्थायीभावाचा उल्लेख नाही असा एक आक्षेप आहे. याचाही एकदा विचार करायला पाहिजे. कारण पुढे रसांचे वर्णन करताना स्थायीभावातून जन्मलेले किंवा स्थायीभाव आत्मा असलेले असे रसवर्णन आलेले आहे. असे दिसते की, काव्याचा आत्मा रस असतो असे भरताने कुठे नोंदवलेले नाही. पण निदान सहा रसांचा आत्मा स्थायीभाव असतो अशी मात्र स्पष्ट नोंद आहे. रसांनाही आत्मे असतात तर ! जर रसांचा आत्मा स्थायीभाव हे असतील तर ही कल्पना समजून घेणे फारच कठीण आहे. मी विचारले, तुम्हाला रसांचा आत्मा ही कल्पना कशी वाटते ? महाराज म्हणाले, काव्याचा आत्मा रस ही भूमिका तरी स्वीकारली पाहिजे, नाहीतर रसांचा आत्मा स्थायीभाव ही भूमिका तरी स्वीकारली पाहिजे, असे मला वाटते. पण काव्याचा आत्मा प्रेक्षकांच्या मनात असतो आणि हा आत्मा कविता वाचताना असतो, काव्य वाचून संपले म्हणजे नसतो. हे समजणे तर मला अधिकच कठीण झाले आहे. मी विचारले, या ठिकाणी सर्वत्र आत्मा शब्द तत्त्वज्ञानातल्या