पान:अभिवादन (Abhivadan).pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


प्रो. कोसंबी आणि भगवद्गीता । ४९


मग माणूस आखून दिलेल्या रस्त्याप्रमाणे बिनतक्रार कर्म करणारा, फक्त निमित्तमात्र होतो. ज्याने त्याने आपापल्या वर्णानुसार निमित्तमात्र होऊन कर्म करावे, त्याचा खेद विषाद बाळगू नये हा गीतेचा प्रमुख उपदेश हिंसा करीत असतानाही अहिंसेचा जप करणान्यांना सोयीस्कर आहे. एकीकडे जपयज्ञ महत्त्वाचा मानणे आणि परंपरागत यज्ञ गौण ठरविणे आणि दुसरीकडे यज्ञातून पाऊस पडतो, यज्ञामुळे देव प्रजेचे व प्रजा देवाचे हित साधतात, असे म्हणणे गीतेलाच शक्य आहे. हा सोयीस्कर दुहेरीपणा ही वरिष्ठवर्गाची इतिहासकाळापासून चालत आलेली कायम पद्धत आहे, तीच गीतेने स्वीकारलेली आहे. म्हणून गीता हा ग्रंथ सर्वस्वी नव्याने बनवून महाभारतात बसविलेला आहे, ते कोणत्याही प्राचीन भागाचे विस्तृतीकरण नाही. वरिष्ठ वर्गाच्या हितासाठी ब्राह्मणांनी केलेला हा उद्योग त्यानंतर काही वर्षेतरी फारसा लोकप्रिय ठरलेला दिसत नाही.
 (कोसंबींची भगवद्गीतेविषयीची ही भूमिका मला पटत नाही. संपूर्ण भगवद्गीता ही सलगपणे बनवून एकत्रितरीत्या महाभारतात बसविली गेली ही भूमिका मान्य करणे कठीण आहे. ननय्याला अकरा अध्याय गीता माहिती आहे आणि जावा भारताला चौदा अध्याय गीता माहिती आहे हे जर लक्षात घेतले तर गीताग्रंथातही क्रमाक्रमाने प्रक्षेप होत गेले असे मानले पाहिजे. मूळ भीष्मपर्वात पहिल्या आणि दुसन्या अध्यायांत संजयाला दिव्यदृष्टी दिल्याचे वर्णन आलेले आहे. पुढे तपशिलाने अकराव्या अध्यायापर्यंत जम्ब खंडाचे विस्ताराने वर्णन आलेले आहे. यानंतर पंधराव्या अध्यायात भीष्म वारल्याची माहिती कळल्यामुळे धृतराष्ट्राचा शोक व संजयाचे सांत्वन सुरू होते. हे अठराव्या अध्यायापर्यंत आहे. १९ व्या अध्यायापासून संजय तपशिलाने पुन्हा युद्ध वर्णन करू लागतो. विसाव्या अध्यायाच्या आरंभी, लढण्याची इच्छा असणारे माझे आणि पांडूचे पुत्र समोरासमोर आल्यानंतर पुढे काय झाले, असा प्रश्न विचारलेला आहे. २१ व्या अध्यायात युधिष्ठिराचा विषाद आणि अर्जुनकृत सांत्वन आहे. २२ व्या अध्यायात युधिष्ठिराने आपल्या सेनेला उत्तेजित केलेले आहे. एवढया घटना घडून गेल्याच्या नंतर पुन्हा धृतराष्ट्राने ' माझ्या आणि पंडूच्या पोरांनी काय केले ते सांग' असे म्हणावे याला काही अर्थच नाही. तेव्हा भगवद्गीता महाभारतात नंतर बसवली ही गोष्ट स्पष्ट आहे. या गीतेपैकी पहिला, दुसरा आणि तिसरा अध्याय हा तुकडा सलग आहे. महाभारतीय कथा वेगवेगळ्या परंपरांनी वाढतात आणि मग त्यांचे एकत्रीकरण होते ही घटना लक्षात ठेवली तर एका परंपरेतील गीता अध्याय एक, दोन, तीन आहे हे मान्य करावे लागते. तिसऱ्या अध्यायाच्या आरंभीचा प्रश्न ज्ञान की कर्म, सांख्य की योग हे निश्चित सांग असा आहे. हाच प्रश्न पुन्हा भगवद् गीतेच्या पाचव्या अध्यायात येतो. त्या अर्थी अ. १, २, ५ आणि ६ ही गीतेची दुसरी परंपरा मानली पाहिजे. चौथा