पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/9

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'शेतकरी संघटना म्हणजे फक्त शेतकऱ्यांची संघटना, नोकरदारांच्या चळवळीप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या पदरात काहीतरी पाडून घ्यावे या उद्देशाने केलेली चळवळ' अशी समजूत अनेकांची पहिल्यापासून झालेली आहे. शेतकरी संघटनेला काही जागतिक ऐतिहासिक आणि दार्शनिक पाया आहे. शेतकरी संघटनेच्या शेतकीच्या अर्थकारणाव्यतिरिक्त इतर विषयांवर एवढे लिखाण होऊनही त्याकडे जावे तसे लक्ष गेलेले नाही. 'इंडिया-भारत' ही शब्दप्रणाली आता सर्व देशभर प्रचलित झाली, एवढेच नव्हे तर रूढ झाली आहे. 'शेतीमालाला रास्त भाव न देण्याचे धोरण सरकारचेच आहे' हे आता सरकारनेही मान्य केले आहे आणि सर्व नेतेही आता ते मान्य करतात. 'कर्जमुक्ती' ही शेतकरी संघटनेची मागणी आता शासनानेही मान्य करून, ती आपल्याच नावाने खपवण्याचा प्रयत्न चालवला आहे. अशा परिस्थितीमध्ये, जे नवनवीन प्रश्न आज उभे राहत आहेत त्या प्रश्नांचाही काही अंदाज शेतकरी संघटनेला दहा वर्षांपूर्वी आला होता, हे या संग्रहातील लेखांवरून दिसून येईल. उदाहरणार्थ, हवामानातील बदल, वातावरणाचे व पर्यावरणाचे प्रदूषण या विषयीसुद्धा शेतकरी संघटनेचा विचार किती सर्वंकष आणि एका धाग्याने विणलेल्या महावस्त्रासारखा आहे, याची जाणीव ज्यांना आतापर्यंत आली नसेल त्यांना या 'अन्वयार्थ-१' आणि 'अन्वयार्थ-२' या लेखसंग्रहांमुळे ती होईल अशी आशा आहे.


९ फेब्रुवारी २०१०
शरद जोशी
 
नऊ