सोन्याची अंडी घालणारी कोंबडी, सगळी अंडी एकाच दिवशी पदरात पाडून घेण्याच्या लालचीपोटी कापून टाकणाऱ्या अंडेवाल्याची गोष्ट लहानपणापासून सर्वांनी अनेकदा वाचली आहे, ऐकली आहे. मनुष्य इतका मूर्ख असू शकतो आणि अशा मूर्खपणापोटी आपल्याच पायावर धोंडा पाडून घेऊ शकतो यावर विश्वासच बसत नाही. 'फार लोभ करू नये' एवढेच तात्पर्य आपण मनात नोंदवून ठेवतो आणि सोन्याची अंडी घालणाऱ्या कोंबडीच्या मालकाची गोष्ट विसरून जातो.
असे मूर्ख लोभी, आज २००० मध्ये पृथ्वीतलावर आहेत, आपल्या देशात आहेत. ते कोठे गल्लीबोळात अंडीकोंबड्यांचा उद्योगधंदा करीत नाहीत, तर लोकांनी निवडून दिलेल्या शासनाचे प्रमुख म्हणून सिंहासनाधिष्ठित आहेत असे म्हटले तर कोणाचा विश्वास बसणार नाही; पण हे खरे आहे. २००० सालातील ही गोष्ट कोण्या करीम अंडेवाल्याची नाही, खुद्द महाराष्ट्र शासनाची आहे. प्रश्न सोन्याच्या अंड्यांचा नाही. दोनपाच सोन्याच्या अंड्यांची किंमत होऊन होऊन अशी किती होणार आहे? त्यापेक्षा लक्षलक्ष पटींनी अधिक मूल्यवान संपत्ती देणारे साधन महाराष्ट्र शासन कापून टाकायला निघाले आहे. होणारे नुकसान काही अंड्यांचे नाही, कोट्यवधी रुपयांचे आहे. करीम अंडेवाल्याला निदान एकदम पदरात अंडी पडावीत असा विचार तरी होता; तिसऱ्या सहस्रकातील त्याच्या वारसदारांना अविवेकासाठी इतपत सज्जडदेखील काही कारण दिसत नाही.
कल्पना करा, सोन्याची अंडी घालणारी कोंबडी कोण्या करीम अंडेवाल्याऐवजी शासनाच्या हाती आली असती तर काय घडले असते?
एकदम सगळी अंडी पदरात पडावी असा खटाटोप शासन करणार नाही,