पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/317

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जगापासून आणि जागतिक व्यापारापासून विभक्त होणे शक्य नाही, तेव्हा जागतिक व्यापार संस्थेशी संलग्न राहावे; परंतु करारमदार संतुलित होईपर्यंत परदेशी मालावर बहिष्कार घालून शेतीव्यवसायाची स्थिती सुधारावी असा सल्ला ही मंडळी देत आहे. थोडक्यात, जागतिक व्यापार संस्थेत राहून तिला आतून सुरुंग लावावा असा त्यांचा मनसुबा आहे.
 विरोधी पक्षाच्या नेत्यांना बटाटे जमिनीत लागतात की जमिनीच्या वर एवढेसुद्धा कळत नाही, अशी वेळीअवेळी नालस्ती करणाऱ्या पुढाऱ्यांनी असा प्रस्ताव जाहीररीत्या मांडावा याचा अर्थ शेतीविषयात त्यांना बटाटा जमिनीत लागतो का वर लागतो एवढेच समजते, त्यापलीकडे फारसे नाही हे उघड आहे.
 जागतिक व्यापार संस्थेच्या कोणत्याही सदस्य देशाने परदेशी मालावर बहिष्काराचे हत्यार उपसले, तर बहिष्कृत देश काही हात चोळीत स्वस्थ बसणार बसतील हे संभवत नाही. बहिष्कार हा व्यापारविरहित अडथळ्यांचा (Non-Trade Barriers) प्रकार आहे असा दावा ते संस्थेच्या पुढे मांडतील आणि, त्यापलीकडे जाऊन, वेगवेगळ्या तऱ्हांचे व्यापारविरहित अडथळे उभारून चोख प्रत्युत्तरही देण्यास ते कमी करणार नाहीत. असली हत्यारे वापरणे सशक्तांना परवडते, दुर्बलांना नाही.
 खुलेपणाखेरीज विकास नाही आणि विकासाखेरीज खुलेपणा नाही अशा दुष्टचक्रात अडकलेल्या गरीब देशांनी अकडम् तिकडम् घोषणाबाजीला बळी न पडता, निश्चयाने आणि संयमाने जगाबरोबर राहून, जमेल तितका विकास साधत जाण्याचा मार्गच स्वीकारला पाहिजे. या विकासाच्या मार्गात इतर देशांनी उभे केलेले अडथळे दूर करू लागण्याआधी आपल्याच राष्ट्रीय सरकारने रचलेली शेतकरीविरोधी मोर्चाबंदी मोडून काढणे महत्त्वाचे आहे.
 पण, शेतकऱ्यांच्या लुटीची धोरणे राबवून नाव कमावलेले पुढारी आत्मलक्ष्यी होणार नाहीत, दुसऱ्या देशांविरुद्ध आरोळ्या ठोकून लोकप्रियता मिळविण्याचा प्रयत्न करणार हे उघड आहे.

दि. १०/११/२००१
■ ■

अन्वयार्थ - दोन / ३१९