एक बनून गेली आहेत.
यापूर्वी सरकारी ताकद ही देशाचे संविधान, कायदा, न्याय आणि सुव्यवस्था यांसाठी लढणारी संस्था होती; आता, 'सब कुछ चलता है' अशा थाटात सरकारे वागूही लागली आहेत आणि त्यांच्या शस्त्रबलाचा उपयोगही करू लागली आहेत.
दुर्दैवाने, 'इंडिया' सरकारच्या आतंकवादाचा पहिला बळी भारतीय शेतकरी होणार आहे. गुजराथमधील सारे पोलिस दल बोंडअळीपासून बचावलेले कापसाचे उभे पीक उखडून टाकून जाळण्याच्या कामासाठी सज्ज झाले आहे. याबाबतीत कोणालाही दयामाया दाखविली जाणार नाही अशी मोठी उर्मट भाषा केंद्रीय कृषिमंत्री श्री. अजित सिंग यांनी दूरदर्शनवरील एका मुलाखतीत वापरली.
यंदा गुजराथमध्ये कापसाच्या पिकावर बोंडअळीचा प्रचंड हल्ला झाला; बहुतेक सारे पीक नष्ट झाले; मात्र वेगवेगळ्या जिल्ह्यांत विखुरलेले दहा हजार एकरांवरचे पीक शाबूत राहिले आहे याचे सर्वांना नवल वाटले, एवढेच नव्हे तर या वावरांत बोंडअळीचा त्रास नाही आणि पीकमात्र भरघोस हे असे कसे झाले म्हणून चौकशी सुरू झाली. दिल्लीच्या पर्यावरण आणि जंगल मंत्रालयाने दोन शास्त्रज्ञांची समिती तपासणीसाठी पाठविली. एक सदस्य नागपूर येथील कापूस संशोधन संस्थेचे डॉ. सी. डी. मायी आणि दुसरे, दिल्ली येथील जैविक तंत्रज्ञान विभागातील अधिकारी डॉ. टी. व्ही. रामनय्या.
समितीने गुजराथमधील गांधीनगर जिल्ह्यात, विशेषतः दहेगाम तालुक्यात भरभरून आलेल्या पिकांची पाहणी केली आणि निष्कर्ष काढला की, बोंडअळीशी टक्कर देऊन तरारून उभ्या असलेल्या, गुजराथमधील पिकात CRY1A या जनुकाचा अंश आहे.
जैविक तंत्रज्ञानाच्या प्रगतीने जगभरच्या शेतीत अनेक पिकांच्या बाबतीत प्रचंड क्रांती घडून आली आहे. या सगळ्या संशोधनात मानाचे स्थान कापसाच्या जैविक बियाण्याचे आहे. कापसाच्या या बियाण्यात बोंडअळीला घातक असे, एरव्ही जमिनीत सापडणारे एक (CRY1A) जनुक घालण्यात आले आणि त्यामुळे, या Bt बियाण्याचे पीक बोंडअळी आणि इतर काही किडींचा, कोणत्याही औषधाचा फवारा केल्याखेरीज, नायनाट करू लागले.
कापसाचे हे वाण आता जगभर झपाट्याने पसरले आहे. अमेरिकेत कापसाखालील जवळजवळ निम्मे पीक या वाणाचे निघते. गेल्या काही वर्षांत चीनमध्ये या वाणाची पेरणी ३५ पटींनी वाढली आहे. या वाणाचा प्रयोग