पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/303

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






इंडियन सरकारी आतंकवाद


 आंतरराष्ट्रीय आतंकवादाचा विषय सध्या रणभूमीवर, एवढेच नव्हे तर घराघरात पेटता आहे. मॅनहॅटनमधील जागतिक व्यापार केंद्रावरील ११ सप्टेंबरच्या विमान आदळण्याच्या प्रकाराने एका क्षणात 'देशाचे लष्कर' या संकल्पनेलाच जबरदस्त धक्का दिला आहे. जिवावर उदार होऊन उठलेली एखादी लहान टोळीही जागतिक महासत्तांना कुंठित करू शकते असे, मुंगीने हत्तीच्या कानात शिरून त्याला नामोहरम करण्याचे, एक नवे युग सुरू झाले आहे.
 ११ सप्टेंबरच्या आधी आतंकवादाविषयी चर्चा होई तेव्हा त्यात 'सरकारी आतंकवाद' असाही एक शब्दप्रयोग केला जाई.
 पंजाबमध्ये खलिस्तानी अतिरेक्यांनी जागोजाग बाँबस्फोट केले, बसगाड्यांमधून माणसांना उतरवून गोळ्यांच्या वर्षावात त्यांना ठार केले ही सारी आतंकवादाची उदाहरणे. असा आतंकवाद शमविण्याकरिता पोलिस, निमलष्करी दले यांनी जो हैदोस घातला त्या प्रकाराला 'सरकारी आतंवाद' असे म्हटले जाई.
 कायद्याचा काहीही आधार नसताना, साक्षीपुराव्याची फारशी पर्वा न करता, अरेरावीने, पुष्कळदा खासगी द्वेषापोटी कोणालाही पकडून आणणे, पोलिस चौकीत त्याचा अनन्वित छळ करणे आणि प्रसंगविशेषी. त्याने पलायन केल्याचे नाटक करून त्याला गोळी घालून ठार करणे ही सारी 'सरकारी आतंकवादा'ची लक्षणे.

 ११ सप्टेंबरनंतर 'राष्ट्रीय लष्कर' या संस्थेचा संदर्भ बदलला. जगभर आता, इतिहासाच्या सुरुवातीच्या काळात रानटी जमातींच्या टोळ्या एकमेकांशी लढत असत, तशीच परिस्थिती, इतिहासाने पुन्हा एकदा उभी केली आहे. ईशान्येकडील नागा टोळ्या, दक्षिणेतील तामिळ वाघ, काश्मिरातील आतंकवाद्यांच्या अनेक संघटना यांच्या बरोबरीने लढणारी 'राष्ट्रीय लष्करे'ही अशा टोळ्यांपैकीच

अन्वयार्थ - दोन / ३०५