पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/285

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रचले, त्यातून 'वॉटर गेट' प्रकरण निघाले आणि निवडणुकीच्या आधीच राष्ट्राध्यक्षांची हकालपट्टी झाली.
 इंदिरा गांधीजींचे सुपुत्र राजीव गांधी यांनातर आईच्या हत्येचा प्रत्यक्ष राजकीय फायदा मिळाला. सर्व उच्चांक मोडणारे बहुमत घेऊन अत्यंत तरुण वयात पंतप्रधानकीचे पद त्यांच्याकडे चालून आले. देशाच्या भल्याकरिता काहीतरी सज्जड करून दाखविण्याची अशी संधी तोपर्यंत कोणाला मिळाली नव्हती. यापुढेही कोणाला मिळण्याची शक्यता दिसत नाही.
 दुर्दैवाने, त्यांनी आपल्या शाळकरी दोस्तांचे टोळके जमा केले.
 राजीवजींनी कृत्रिम धाग्यांच्या वस्त्रांना उत्तेजन देणारे धोरण आखले, शहाबानोप्रकरणी अल्पसंख्याकांचा अनुनय केला आणि, शेवटी, बोफोर्स प्रकरणात सापडून पाच वर्षांच्या मुदतीत ते निवडणूक साफ हरले.
 एकदा निवडून आलेले सत्ताधारी मिळालेल्या मुदतीत काहीतरी करून दाखविण्याचा विडा न उचलता, लोकाराधनेच्या स्वस्त साधनांकडे का वळतात हे मला न उमगलेले कोडे आहे.
 महाराष्ट्रात काँग्रेसची सद्दी संपली, भाजपा - शिवसेना युतीचे सरकार आले. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. त्यानंतर पहिल्या भेटीत त्याचे अभिनंदन केले. कधी काळी पूर्वी शिवाजी पार्कच्या सभेत बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, "आम्ही शरद जोशींना आमचे मुख्यमंत्री करू!" त्याचा उल्लेख करून सदाविनयशील मनोहरराव म्हणाले, "तुम्ही हे पद नाकारले म्हणून मी मुख्यमंत्री झालो." मी युतीच्या सरकारचे प्रमुखपद स्वीकारण्याची काहीच शक्यता नव्हती; पण, त्याचा उल्लेख मनोहर जोशींनी करावा हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. तितक्याच विनम्र भावाने त्यांनी मला विचारले, "शासन चालविण्याविषयी तुम्ही मला काय सल्ला द्याल?"

 मी म्हटले. "प्रत्येक मुद्यावर आणि धोरणावर सल्ला देण्याचा अजागळपणा मी करणार नाही; पण, एका वाक्यात सांगतो - देशाकरिता आणि महाराष्ट्राकरिता जे जे करणे योग्य आहे ते करण्याच्या कार्यक्रमाला बेधडकपणे लागा; पुढच्या निवडणुकीचा विचारही करू नका. चांगले काम केले तर लोक त्याला दाद देणार नाहीत असा संशयही मनात आणू नका." मनोहरपंतांना माझा सल्ला पटला असे दिसले; अमलात आणणे शक्य झाले नसावे. परिणामी, आता पुन्हा युतीचा पराभव झाला.
 अटल बिहारी वाजपेयी या वेळी पंतप्रधान झाले त्यानंतर लगेचच त्यांनी

अन्वयार्थ – दोन / २८७