पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/280

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






पंतप्रधानांच्या घोषणेतील चार मोठी आव्हाने


 पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी काश्मीर, पाकिस्तानशी संबंध असे प्रश्न सोडल्यास इतर विषयांवर बोलताना फारशी जहाल भाषा वापरीत नाहीत आणि कार्यक्रमांच्या घोषणाही नेमस्तपणे करतात. राज्यकर्त्या लोकशाही आघाडीत आणि संघपरिवारातील संस्थांत त्यांची नेमस्तपणाची प्रतिमा आहे. ते कसलेले वाक्पटू सांसद असल्यामुळे भाषण करताना ते फारसे हातवारे करीत नाहीत, आवाजात चढउतार करीत नाहीत; इंग्रजी वक्त्यांच्या आदर्शाप्रमाणे, जवळजवळ, त्यांच्या फक्त खालच्या ओठांचीच हालचाल दिसते.
 पंतप्रधानांच्या बोलण्याचालण्याच्या शैलीमुळे त्यांच्याविषयी अनेक गैरसमज होतात. वाजपेयीजी आता वृद्ध झाले, प्रकृतीही फारशी साथ देत नाही, पक्षात पर्यायी नेतृत्व तयार झालेले नसल्यामुळे ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीची चोवीस पक्षांची मोट कशीबशी सांभाळत एकएक दिवस मोजीत काढीत आहेत अशी अनेकजण समजूत करून घेतात. पाकिस्तानच्या संबंधांतही, वाजपेयीजी आता महात्मा गांधींसारखीच भूमिका घेत आहेत अशी टीका, 'गांधीजी मुसलमानांचा अनुनय करीत होते' असे वर्षानुवर्षे आग्रहाने प्रतिपादणारे एक हिंदुत्ववादी नेते करीत असताना एकदा ऐकायला मिळाले.
 गेल्या १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात देशाच्या एकूण परिस्थितीचा अहवाल पंतप्रधानांनी, अगदी साध्यासरळ पद्धतीने द्यावा तसा, दिला होता. त्यानंतर १५ दिवसांत पंतप्रधान काही तडकाफडकी महत्त्वाची कार्यवाही करतील अशी कोणाची अपेक्षा नव्हती. अनपेक्षित ते पंतप्रधानांनी पुन्हा एकदा करून दाखविले.

 दिवस १ सप्टेंबर २००१. सकाळी राष्ट्रीय विकास परिषदेच्या बैठकीत पंतप्रधानांनी आर्थिक सुधारणांसंबंधी एक कार्यक्रमपत्रिका देशासमोर ठेवली.

अन्वयार्थ – दोन / २८२